यंदाही आषाढी एकादशीवर कोरोनाचं सावट असल्यामुळे वारकऱ्यांच्या वारीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भाविकांना आणि वारकऱ्यांना जाण्यासाठी बंदी होती. परंतु मानाच्या पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांनी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी झाली होती. वारकऱ्यांनी केलेल्या गर्दीमुळे कोरोना नियमांची पायामल्ली झाली. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी आजच दर्शन घेण्याची मागणी केली होती यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. अखेर प्रशासनाने वारकऱ्यांसोबत काही तास बैठक घेतल्यानंतर तोडगा काढण्यात आल्यामुळे वारकरी माघारी परतले.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त मानाच्या १० पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. या पालख्यांसोबत आलेल्या वारकऱ्यांनी उत्तर दरवाजासमोर मोठी गर्दी केली होती. यामुळे कोरोना नियमांची पायामल्ली झाली. मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मानाच्या १० पालखी सोहळे जेव्हा पादुकांसह पौर्णिमेला विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात तेव्हा सोबत असलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन देण्याची प्रथा आहे. पंरतू यंदा तसे होणार नव्हते मात्र वारकऱ्यांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे सर्व वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्व वारकरी मंडळी मंदिरासमोर आल्यामुळे प्रशासनाचाही गोंधळ उडाला होता.
शेकडो वारकरी अचानक आल्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला परंतु दोन ते ३ तासात मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सर्व मानाच्या पालख्यांच्या प्रमुखांशी बैठक घेऊन चर्चा करुन तोडगा काढला यामुळे वारकरी पुन्हा माघारी परतले आहेत. प्रशासन वारकऱ्यांना दर्शनासाठी वेळ कळवणार असल्याची माहिती माऊली पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे यांनी दिली आहे.