सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. मतदार सकाळीच घराबाहेर पडले होते. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर सकाळी साडेसात नंतर रांग लागली होती. अनेक मतदान केंद्रावरील इव्हीएम मशीन्स बंद पडल्याने नागरिकांचा हिरमोड झाला होता. कल्याण पूर्वेतील जरीमरी शाळा येथील १० मशीन बंद होत्या. तब्बल ४० मिनीटानंतर इथल्या मशीन सुरू झाल्या, त्यामुळे मतदारांना ताटकळत राहावे लागले. तर अनेक मतदार कंटाळून निघून गेले.
मतदान यंत्रातील बिघाड
तसेच डोंबिवली टिळकनगर शाळेतील मतदान यंत्रात बिघाड झाला होता. तसेच कल्याण कचोरे येथील कृष्ठ रुग्ण वसाहत मधील मशीन एक तास उशिराने सुरू झाल्या होत्या. तर उल्हासनगर गंगाराम शाळा मशीन बंद पडली होती. कल्याण ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी मशीन बंदचा फटका मतदारांना सहन करावा लागला. ज्या ठाकाणी मशीन्स बंद पडल्या. त्याठिकाणी मतदानाची वेळ वाढविण्याची मागणी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी निवडणूक अधिका-यांना केली होती. त्यानुसार अनेक ठिकाणी अर्धा तास वाढवून देण्यात आला होता. सकाळी अकरा वाजेपर्यंत अवघे साडेसहा टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजता १८. ४८ टक्के तर तीन वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान झाले.
उन्हाच्या त्रासाने मतदार घरातच
उन्हाच्या त्रासामुळे अनेक मतदार हे घराबाहेर पडले नाहीत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ४०. ८३ टक्के मतदान झालं होत. मतदार यादीतील गोंधळ यंदाही पाहावयास मिळाला. अनेकांची नावे वगळण्यात आल्याने मतदानापासून वंचित राहिले. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र नापसंती व्यक्त केली. राजकीय पक्षांकडून बूथ कमी प्रमाणात लावण्यात आले होते. त्यामुळे मतदारांना यादीत नाव शोधताना खूपच तारांबळ उडाली होती. ज्येष्ठ नागरिकांना याचा खूपच फटका सहन करावा लागला. डोंबिवली मनसेच्या विद्यार्थी सेनेने ए लाव रे तो व्हिडीओचे टीशर्ट घालून मतदान केले.