पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला आज त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. मुंबई ते साईनगर शिर्डी आणि सोलापूरसाठी या दोन एक्सप्रेस आजपासून धावू लागल्या. त्यामुळे देशातील वंदे भारत गाड्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. याआधी १९ जानेवारीला नरेंद्र मोदींनी मुंबईत विविध विकास कामांचा शुभारंभ आणि दोन मेट्रोचं लोकार्पण केलं होतं. तसंच पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सैफी अकादमीच्या अंधेरी पूर्व येथील संकुलाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सोलापूर आणि सीएसएमटी ते शिर्डी या दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई ते शिर्डीचा प्रवास ५.३० तासांत आणि मुंबई ते सोलापूरचा ६ तास ३० मिनिटांत होणार आहे. सीएसएमटी स्थानकावर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. तसंच नुकत्याच झालेल्या ग्लोबल सर्व्हे मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देशातील पहिल्या क्रमांकात झळकल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केलं. आपल्या देशासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Mumbai | Prime Minister Narendra Modi flags-off Mumbai-Solapur Vande Bharat Express.
Railway Minister Ashwini Vaishnaw, CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis present at the occasion. pic.twitter.com/jaoypVB4bz
— ANI (@ANI) February 10, 2023
यावेळी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. त्यात आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चॅलेंज देत त्यांच्यावर टिका करताना दिसून आले. “राज्याचे मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीला जातात, गुवाहाटी आणि सूरतला जातात…पण दिल्लीला जाऊन महाराष्ट्र राज्यासाठी काय मागितलं? असा सवाल आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. याला उत्तर देण्यासाठी आज वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योग्य वेळ साधली.
आदित्य ठाकरेंच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देत मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इतरजण जे विचारतात, महाराष्ट्रासाठी काय दिलं? तर त्यांनी बहूतेक देशाचा अर्थसंकल्प वाचला नाही. रेल्वे मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार महाराष्ट्रासाठी आतापर्यंत रेल्वेसाठी १३ हजार ५०० कोटी कधीच मिळाले नव्हते. ही पहिली वेळ आहे ज्यात महाराष्ट्रासाठी १३ हजार ५०० कोटींचं बजेट मिळालं. असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. ”
“आमचे युती सरकार सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आले असून, केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 13 हजार 500 कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे, त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल”, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
याप्रसंगी वाकोला ते कुर्ला आणि सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस फ्लायओव्हर आणि मालाडमधील कुरार व्हिलेजमधील वाहनांसाठी दोन अंडरपासचे देखील लोकार्पण करण्यात आले. “पंतप्रधानांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते, त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले जाईल” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सिंचन, रस्ते प्रकल्प कृषी इन्फ्रा, गृहनिर्माण, स्टार्टअप, महाराष्ट्र सर्व क्षेत्रात या केंद्रीय अर्थसंकल्पातून खूप काही मिळाले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार पंतप्रधानांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी कठोर प्रयत्न करेल.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सुक्ष्म लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते.