राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज अर्थमंत्री अजित पवारांनी महाविकासआघाडीचा पहिला वहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विरोधकांना चिमटे काढत शेरोशायरीने अर्थसंकल्पाला सुरुवात केली. तसेच, यावेळी त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी देखील माहिती दिली. केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारी रक्कम कमी झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्कम थकित देखील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यावरच्या कर्जाची रक्कम सांगून त्यावर राज्य सरकारकडून काय उपाययोजना केल्या जातील, यावर देखील अजित पवार यांनी यावेळी माहिती दिली.
राज्य कर्जाच्या डोंगराखाली!
दरम्यान, आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीविषयीची आकडेवारी सांगितली. राज्यावर सध्या ४ लाख ३३ हजार ९०१ कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं ते म्हणाले. त्याशिवाय, राज्य सरकारने दिलेली हमीची रक्कम ४६ हजार ८९१ कोटी रुपये असल्याचं देखील आपल्या भाषणात ते म्हणाले. त्यासोबतच, राज्य सरकारतर्फे सध्या राबवल्या जात असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची किंमत २ लाख ७०० कोटी रुपये इतकी असल्याचं ते म्हणाले.
अजित पवारांची शेरोशायरी!
अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना टोमणा लगावला. सर्वाधिक जागा जिंकून देखील भाजपला राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. मात्र, अर्थमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘जनतेनं विश्वास दाखवल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं’, असं म्हणताच विरोधकांनी घोषणाबाजी करत या वक्तव्याची टर उडवली. मात्र, त्याला लागलीच हरिवंशराय बच्चन यांच्या शायरीच्या माध्यमातून अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.
असफलता भी एक चुनौती है
उसे स्वीकरा करो
क्या गलती हुई देखो
उसे सुधार करो…
असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधताच सत्ताधारी बाकांवरून त्याला दाद मिळाली!