Gulabrao Patil : अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागितल्यानंतर, रस्त्यांबाबत अभिनेत्रीचे नाव घेऊन चुकीचं बोलून गेलो, असे वक्तव्य केले आहे. एवढेच नाही तर आता मी तो गाल सोडला असून ओमपुरीचा गाल पकडला आहे असे ही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
एका कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य केले असून ते म्हणालेत, ‘रस्त्यांबाबत बोलताना अभिनेत्री विषयी चुकीचं बोलून गेलो पण ते वक्तव्य फार चाललं. कॅमेरा वाल्यांनी ते प्रकरण फारचं लावून धरलं. त्यामुळे मी आता तो गाल सोडलाय आणि ओमपूरीचा गाल धरलाय. याच्यावर तरी कोणी टीका करु नये. लोक बोलणाऱ्यां माणसांच्या मागे लागून ते बोलले की त्यांच्यावर टीका करायला लागतात. काम हे आमचे मोठे भांडवल आहे आणि ते काम करण्याचे काम आम्ही केले आहे,’ असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
डिसेंबर २०२१मध्ये शिवसेनेचे पालक मंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूकीत विरोधकांवर टीका करताना जीभ घसरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत गुलाबराव पाटील म्हणाले होते. माझ्या मतदार संघातील रस्ते मी हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत केले आहे. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केली होती. गुलाबरावांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. अखेर आपले विधान आपल्याच अंगलट येण्याआधी गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली होती. मात्र आता पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे आता यावर पुन्हा टीका टिपण्णी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – पुणे कोविड सेंटर घोटाळा प्रकरण, किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजितदादांचा मोठा खुलासा