मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत गुरूवारी संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परतीच्या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. मुंबईसह ठाण्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. परंतू, राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर ओसरल्याचे पाहायला मिळते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परतीचा पाऊस शनिवार 15 ऑक्टोबरपासून माघारी परतत असून, राज्यात उघडीपीची शक्यता आहे. मात्र, सध्या मुंबईसह ठाणे परिसरात ढगाळ वातावरण असून, पावसाची शक्यता आहे.
परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्या खरीपाच्या पिकांची काढणी सुरु आहे. या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मागील पाच ते सहा दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा चांगलाच जोर होता. 14 ऑक्टोबरपासून म्हणजे उद्यापासून परतीच्या मान्सूनच्या माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळण्याची शक्यता आहे.
दिवाळ सणादरम्यान साधारण 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान राज्यात किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले. रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनातील किरकोळ पाऊस पडणार आहे. उद्यापासून राज्यात न्सून माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. त्यामुळं राज्यात पावसाची उघडीप होणार आहे.
मुंबईत चार महिने बरसणाऱ्या पावसाचा परतीचा प्रवास सुरु असताना गुरुवारी दुपारी शहर आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह पावसाने काही वेळ जोरदार बरसात केली. आकाशात काळ्या ढगांनी एकच गर्दी केल्याने मुंबईकर काहीसे धास्तावले होते. सुदैवाने संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाला आणि मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या कालावधीत शहर भागात 15.66 मिमी, पश्चिम उपनगरात – 9.74 मिमी आणि पूर्व उपनगरात – 5.71 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.
हेही वाचा – हिंदू मुलीला कुंकू लावायची परवानगी, मग हिजाबला विरोध का? ओवैसींचा सवाल