राज्यात मशिदींवर असलेले भोंगे येत्या ३ मेपर्यंत काढून टाका अन्यथा त्याच मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवण्यात येईल असे अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत दिले आहे. गुढी पाडव्याला झालेल्या सभेमध्ये मशिदींवरील भोंग्यांविरोधात राज ठाकरेंनी आक्रमक घेतली आहे. तेव्हा मनसैनिकांना मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले होते. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील वातावरण बिघडू देणार नाही. पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अल्टिमेटमबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सरकारने मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमचा “गंभीर” विचार केला आहे आणि यामुळे कोणालाही राज्यातील वातावरण बिघडू देणार नाही.
राज ठाकरेंचा दावा गृहमंत्र्यांनी काढला खोडून
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरी भोंगे काढून टाकण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्याचे सांगितले आहे. यावर आता गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो, तो न्यायालयीन निर्णय असा आहे की ज्यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावू शकत नाही. यासाठी न्यायालयाने आवाजाची क्षमता ठरवून दिली आहे. न्यायालयाने कुठल्याही मंदिरावरचे किंवा मशिदीवर परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढण्याचा निर्णय दिला नाही. असे सांगून गृहमंत्र्यांनी राज ठाकरेंचा दावा खोडून काढला आहे.
राज ठाकरेंचे अल्टिमेटमवर पोलीस सज्ज
राज्यात कोणत्याही प्रकारचे वातवरण निर्माण होऊन देणार नाही. आम्ही सर्वांना घेऊन चालणारे लोकं असून आमच्यासाठी सर्वजण सारखे आहेत. राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट आहेत. पोलीस सज्ज आहेत. त्यामुळे कोणतीही तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही.
हेही वाचा : पवारांची समाजकारणातील अन् राजकारणातील भूमिका सगळ्यांना माहिती, दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांवर पलटवार