मुंबई तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होताहेत, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणजेच जायका यांनी यासाठी अर्थसहाय करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
वर्षा येथे आज सकाळी जायकाचे प्रेसिडेंट डॉ तनाका अखिको, चीफ रिप्रेझेंटेटिव्ह साईतो मित्सुनोरी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली. राज्य शासनाला जायकाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. विशेषत: मुंबईतील भूमिगत मेट्रो, मुंबई-गोवा महामार्ग तसेच विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोर या व इतरही काही मोठ्या प्रकल्पांसाठी जायकाने अर्थसहाय करण्यावर चर्चा झाली.
अशा मोठ्या प्रकल्पांना अर्थसहायाबाबत जायका आणि राज्य शासन यात समन्वय असावा यासाठी एक समन्वयन अधिकारी शासन नेमेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. प्रारंभी या शिष्टमंडळाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले की, जायकाच्या मदतीने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात मोठमोठे विकास प्रकल्प मार्गी लागले असून मध्यंतरी दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही महाराष्ट्राने १ लाख ३७ हजार कोटींची भरीव गुंतवणूक आणल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
जायकाच्या शिष्टमंडळात ताकूया ओत्सूका, मसनोरी सकामोटो, अनुराग सिन्हा आदींचा समावेश होता. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, मंत्रालयातील वॉर रूमचे महासंचालक राधेशाम मोपलवार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजकुमार देवरा आदींची उपस्थिती होती.