लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांनी जत तालुक्यातील शेवटच्या गावाला पाणी मिळावे यासाठी ‘कासेगाव – उमदी’ अशी पदयात्रा काढली होती. त्यांचे अपुरे असलेले स्वप्न उमदीकरांना पाणी देऊन पूर्ण करण्याचे काम त्यांचा मुलगा आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले असून आज उमदीकरांना कृष्णामाईचे पाणी मिळाले आहे. त्याबद्दल इथल्या ग्रामस्थांनी जल्लोष करत लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील आणि जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत. जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना उन्हाळा आला का पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत होते.
कृष्णामाईचे पाणी शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे उमदीच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचे भाव दिसले आहेत. तर बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणी आल्यामुळे नागरिकांनी पाणी टंचाईपासून सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
बंदीस्त पाईपलाईनद्वारे कृष्णा माईचे पाणी आज उमदी येथे दाखल झाल्याने माझे शेतकरी बांधव मोठा जल्लोष करत आहे. माझ्या या बांधवांचा आनंद पाहताना मलाही प्रचंड आनंद होत आहे. pic.twitter.com/3MkKQiTcQo
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 15, 2021
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. बंदीस्त पाईपलाईनद्वारे कृष्णा माईचे पाणी आज उमदी येथे दाखल झाल्याने शेतकरी बांधवांनी मोठा जल्लोष केला आहे. माझ्या या बांधवांचा आनंद पाहताना मलाही प्रचंड आनंद झाल्याचे सांगतानाच खरंतर हा दुग्धशर्करा योग असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जत तालुक्यात पाणी आणण्याचे स्वप्न स्वर्गीय राजारामबापू यांनी पाहिले होते, ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे तसेच जत तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आल्याचे सांगताना त्यासाठीचे आज पहिले यशस्वी पाऊल पडल्याचेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.