खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा या दाम्पत्य आज मुंबईत दाखल झाले आहेत. या दाम्पत्याने 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. राणा दाम्पत्य आज वाय सुरक्षा सोडून मुंबईत विमान मार्गे दाखल झालेत. या अनुषंगाने आता मातोश्री निवासस्थानाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र राणा दाम्पत्याच्या या मातोश्रीबाहेरील हनुमान चालीसा पठणावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हल्लाबोल केला आहे. (Kishori Pednekar Latest News)
“मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नका”
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “राणा दाम्पत्य हे नौटंकी करक असून ते सुपारी बहाद्दर दाम्पत्य आहे. अपक्ष आमदार, खासदार असलेल्या या दाम्पत्याला झेड प्लस सुरक्षा देण्याचे कारण काय? जनतेचा पैसा असा कुठेही खर्च केला जातोय का? जीवाला धोका असेल तर सिक्युरिटी देणे ठीक आहे. त्यांना हनुमान चालीसाचं म्हणालयची असेल तर त्यांनी एखाद्या मंदिरात जा किंवा अन्य कुठेही जा, पण मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नका”, असा इशारा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
“हनुमान चालीसा मुखोद्गत आहे तेव्हा ही नौटंकी बंद करा”
“शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, त्यांनी अमरावती या त्यांच्या मतदारसंघात लक्ष द्यावे. हे सुपारीबाज दाम्पत्या कसला गनिमीकावा करणार? याला नीच आणि घाणेरडा कावा म्हटले पाहिजे. हिंदुत्त्व हे आमच्या रक्तात आहे. हिंदुत्व आमचा ध्यास आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे आम्हाला हनुमान चालीसा मुखोद्गत आहे तेव्हा ही नौटंकी बंद करा”, असा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
“भाजपचं सरकार नाही तिथे हे दाम्पत्य भ्रमंती करणार हे लिहून ठेवा”
“शिवसैनिकांची माथी भडकवण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आलेय. त्यांना मुंबईत दंगल घडवायची आहे, हे अपक्ष दाम्पत्य दुसऱ्याच्या जीवावर निवडून येतात, पैशांच्या जोरावर निवडून येतात आणि माज करतात. आता वाय झेड सुरक्षा मिळाल्याने त्यांनी देशभरात भ्रमंती करायची आहे. जिथे भाजपचं सरकार नाही तिथे हे दाम्पत्य भ्रमंती करणार हे लिहून ठेवा, हे दाम्पत्य बरळत राहणार आणि मुंबई-महाराष्ट्र अस्थिर करणार असा गंभीर आरोप करत त्या पुढे म्हणाल्या की, शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या संयमी आणि सुसंस्कारी नेतृत्त्वात काम करणातय. त्यामुळे शिवसेना संयमी आहे”, असही पेडणेकर म्हणाल्या आहेत.