विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी त्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर सोमवारी अध्यक्षपदाचा अर्ज भरला जाणार आहे. काँग्रेसकडून अध्यक्षपदाचा अर्ज भरला जाणार आहे. परंतु उमेदवार कोण असणार? हे अद्यापही समोर आलेलं नाहीये. त्यामुळे याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधल्या चार नावांची चर्चा आहे. यामध्ये काँग्रेस पक्षातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे आणि के.सी. पाडवी यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाबाहेर प्रश्न विचारण्यात आला असता पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव अग्रस्थानी असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे.
यंदाची निवडणूक आवाजी मतदानाने होणार
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारकडून नियमावलीत बदल करण्यात आला आहे. यंदाची निवडणूक प्रत्यक्ष मतदानाऐवजी आवाजी मतदानाने होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये, यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, विरोधी पक्षाकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराने वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, असे विरोधकांचे म्हणणे होते. मात्र, राज्य सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन आता २८ डिसेंबरला पार पडणार आहे.
हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारणार का?, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…