भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या वेळ आली तर शिवसेना भवन फोडू या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. लाड यांनी भाषणाचा विपर्यास केल्याचं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा वाद अद्याप शांत झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना हा विषय आमच्यासाठी संपला असल्याचं म्हटलं आहे. पण अंगावर कोणी आलं तर आम्ही सोडत नाही, असा इशारा देखील त्यांनी शिवसेनेला दिला आहे.
तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. प्रसाद लाड यांनी व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही; पण अंगावर आलं तर कोणाला सोडत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
प्रसाद लाड यांनी शनिवारी माहिममध्ये भाजप कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेना भवनासंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं होतं. “आम्ही माहिमध्ये आलो म्हणजे शिवसेना बवन फोडणारच…काय घाबरू नका. वेळ आली तर तेही करू”, असं प्रसाद लाड म्हणाले होते. या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय वाद सुरू झाल्यानंतर रात्री उशिरा प्रसाद लाड यांनी सोशल मीडियाद्वारे सारवासारव करणारा आणि दिलगिरी व्यक्त करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता.
प्रसाद लाड यांची सारवासारव
शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि त्याच शिवसेनाप्रमुखांच्या सेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही!
प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला..! pic.twitter.com/kMo8TuAD5V— Prasad Lad (@PrasadLadInd) July 31, 2021