रत्नागिरी- शिवसेनेचे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Bureau commission) नोटीस बजावली आहे. मी मातोश्रीसोबत एकनिष्ठ असल्यानेच मला नोटीस बजावली गेली, असा आरोप राजन साळवी यांनी केला आहे. तसंच, यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन साळवींनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले.
हेही वाचा – शिवाजी महाराजांची तलवारच भाजपाचं मुंडकं छाटेल, संजय राऊतांचा संताप
शिवसेनेत उलथापालथ झाली. तरीही मी निष्ठावंत राहिलो. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. म्हणूनच, मला एसीबीची नोटीस आली आहे. यंत्रणांचा गैरवापर करत नोटीसा दिल्या जात आहेत. ज्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताचा आरोप ते भाजपमध्ये जात आहेत. मलादेखील तुम्हाला तुरुंगात डांबणार अशा धमक्या आल्या होत्या. पण मी एसीबीच्या नोटिशीला घाबरत नसून चौकशीला सामोरे जाणार आहे. नोटीस पाठवण्याइतके माझ्याकडे कोणते घबाड आहे, हाच प्रश्न मला पडला आहे, असं राजन साळवी म्हणाले.
हेही वाचा – राजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर? रत्नागिरीत उदय सामंत यांच्यासोबत तासभर खलबतं
शिवसेनेत फूट पडल्यानंतर कोकणातून उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर आता राजन साळवीही शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मी तुरुंगात गेलो तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा – कोकणातील रिफायनरीला आता ठाकरे गटाचाही पाठिंबा, राजन साळवींनी मांडली भूमिका
एसीबीची नोटीस आल्यानंतर राजन साळवी यांनी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. आज त्यांना अलिबाग येथे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या चौकशीनंतर काय होतंय ते पाहावं लागेल.