Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी गिरना अॅग्रो कंपनीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांची लूट केली असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल, सोमवारी केला होता. याप्रकरणी दादा भुसे यांनी आज सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. राऊतांना महागद्दार संबोधत याप्रकरणी चौकशी लावण्याचेही आवाहन त्यांनी केले. तसंच, या चौकशीत मी दोषी आढळलो नाही तर राऊतांना त्यांनी मोठं चॅलेंज देऊ केलं आहे.
हेही वाचा – दादा भुसेंकडून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक! संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
दादा भुसे यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फोर्मेशनच्या माध्यमातून संजय राऊतांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. दादा भुसे म्हणाले की, “आम्हाला नेहमी वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर निवडून आलेले महागद्दार राज्यसभेवर निवडून गेले. संजय राऊत यांनी काल एक ट्वीट केलंय. जगाच्या पाठीवर कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या ट्वीटची चौकशी करावी. त्या चौकशीमध्ये मी दोषी आढळलो तर आमदारकीचा, मंत्रीपदाचा राजीनामा देऊन राजकारणातूनही निवृत्त होईन. पण, जर यामध्ये खोटं आढळून आलं तर गद्दारांच्या मतांवर निवडून आलेल्या महागद्दारांनी राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा द्यावा. सामनाच्या संपादकपदाचाही राजीनामा द्यावा.”
हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले.
ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल.@dir_ed@Dev_Fadnavis pic.twitter.com/fYuLIZEhEL— Sanjay Raut (@rautsanjay61) March 20, 2023
संजय राऊतांवर पुढे बोलताना त्यांनी घणाघाती टीकाही केली. ते म्हणाले की, “भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रावादीच्या शरद पवारांची करतात. त्यामुळे मालेगावच्या जनतेची माफी मागितली नाही तर बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेंचे शिवसैनिक या गद्दाराला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत.”
शरद पवारांचा उल्लेख झाल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी यावर हरकत घेतली. तुम्हाला जो मुद्दा मांडायचा आहे तो मांडा परंतु, शरद पवारांचं नाव का घेता, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. तसंच, जयंत पाटलांसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीही यावर हरकत घेत दादा भुसेंना माफी मागण्याचे आवाहन केले. याप्रकरणी सभागृहात गोंधळ वाढल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप केला. शरद पवारांबाबत झालेले वक्तव्य रेकॉर्डवरून तपासले जाईल, त्यांच्याबाबत काहीही अवमानजनक, अपमानजनक दादा भुसे बोलले असतील तर त्यांना माफी मागण्यास सांगण्यात येईल आणि पटलावरून त्यांचे अवमानजनक वक्तव्य काढून टाकण्यात येईल, असं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिले.