भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून अनुयायी दादर चैत्यभूमी परिसरात दाखल होत आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी यंदाही अनुयायांनी गर्दी केली आहे. दरम्यान कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे संकट लक्षात घेता यंदा प्रशासनाने चैत्यभूमीवर अनुयायांना गर्दी न करता घरुनच अभिवादन करावे असं आवाहन केले होते. तरीही हजारोंच्या संख्येने अनुयायी दादर चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत. यावेळी चैत्यभूमीवर प्रवेश नाकारल्याने ऑल इंडिया पँथर सेनेच्या दीपक केदार यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
कोरोनाचे कारण देत प्रवेश नाकारत असल्याने कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पालिकेने कोणतीही व्यवस्था न केल्याने ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी काही कार्यकर्ते आपापसात भिडल्याचे देखील पाहायला मिळाले.
राजकीय नेत्यांच्या लग्नाला गर्दी होते मग आम्हाला कोरोनाचे कारण देत का अडवलं जातं? असं सवाल ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी विचारला. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात घोषणाबाजी सुरु केली. तर काही संतप्त कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्सही खाली पाडले. तर काही अनुयायांमध्ये आणि पोलिसांसोबत झटापट झाल्याचेही पाहायला मिळाले.