सत्तेत नसल्याने भाजपची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे. राज्यातील मंदिरं उघडावीत यासाठी भाजपने आज राज्यभरात शंखानाद आंदोलन केलं. यावरुन देखील नाना पटोले यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे.
नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. सत्तेच्या बाहेर असल्याने भाजप कासावीस झाला आहे. पाण्यातला मासा जसा पाण्याच्या बाहेर काढल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी तर १५ ऑगस्टला मंत्रालयावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांना सत्तेची लालसा किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं. लोकं मेली तरी त्यांना त्याचं काही पडलेलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली.
भाजपने केंद्राचं पत्र वाचावं
भाजपने आज मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं केली. भाजपचे आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देशातील अनेक राज्यात मंदिरं सुरू असल्याचं म्हटलं. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार नाना पटोले यांनी घेतला. केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने स्पेशल पत्रं काढलं आहे. त्याची कॉपी मी त्यांना पाठवतो. ज्या राज्यांचा ते उल्लेख करतात त्या राज्याचा केंद्राच्या पत्रात उल्लेख नाही. त्याचं त्यांनी वाचन करावं, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.
हेही वाचा – उत्सवांवर निर्बंध घालण्याचे निर्देश केंद्राने दिले, मोदींविरोधात भाजप आंदोलन करणार का? – सचिन सावंत