महाराष्ट्रात बुधवारी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी राज्यात ३८८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. बुधवारी मात्र २३७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे एका दिवसात मृतांच्या संख्येत शंभरहूनही अधिकची घट झाली. राज्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार ३९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८६,४१,६३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,३४,८८० (१५.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,७८,७८१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ५४०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
बाधितांचा आकडा काहीसा वाढला
मृतांच्या संख्येत मोठी घट झाली असली तरी कोरोनाबाधितांचा आकडा मात्र काहीसा वाढलेला दिसला. मंगळवारी ९३५० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. बुधवारी हा आकडा १०,१०७ इतका झाला. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ लाख ३४ हजार ८८० झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजार ६६१ इतकी झाली आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
10,107 new cases have been reported in the state today
State tally of #COVID19 positive patients is now 59,34,880
District-wise details of cases and deaths until today are as follows:@airnews_mumbai@airnews_nagpur
(3/4)🧵 pic.twitter.com/DW3ub78sZS
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) June 16, 2021
१० हजार ५६७ रुग्ण कोरोनातून बरे
बुधवारीही कोरोनाबाधितांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक होते. आज राज्यात १० हजार ५६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,७९,७४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के एवढे झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने वाढताना दिसत आहे.