महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच अभूतपूर्व असा गोंधळ झाला. यामुळे भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या निलंबना नंतर १२ आमदारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर १२ आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी भाजपचे निलंबित आमदार संजय कुटे म्हणाले की, ‘आज सभागृहात जे घडले आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे. कारण सभागृहात जो अतिशय जिव्हाळ्याचा विषय ओबीसीचा आहे, त्या विषयाचा ठराव मांडण्यात आला होता. सहाजिक आहे, त्या ठरावावर आम्ही ओबीसीचे जे आमदार आहेत, नेते आहेत, त्यांना त्याच्यावर बोलायचे होते. छगन भुजबळ यांनी ठराव मांडल्यानंतर एकतर्फी खोटे बोलण्याचे रेकॉर्ड करून चुकीच्या गोष्टी या सभागृहाच्या माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.’
पुढे कुटे म्हणाले की, ‘दरम्यान विरोधी पक्ष नेत्यांनी त्या विषयावर बोलवे आणि कसे खोटे आहे हे बोलणार होतो. पण विरोधी पक्षनेते आणि आम्हाला सुद्धा एकशब्द त्यावर बोलू दिला नाही. त्यामुळे साहजिक आहे, आमच्या आक्रमकता येणार आहे. कारण याचे जेव्हापासून ओबीसीचं आरक्षण रद्द झाले त्या दिवसापासून रोज सकाळीपासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलायचे आणि केंद्रावर ढकलायचे एवढाच एकच कार्यक्रम यांचा सातत्याने सुरू आहे.’
‘अॅकॅडमीक चर्चा व्हायला पाहिजे, सभागृहात हे आम्हाला माहित होते. जर भुजबळ काही बोलतायतं, काही मांडतायत, काही पत्र दाखवतायत तर त्या पत्रात सत्यता किती, त्याच्या बोलण्यात, मांडण्यात खरेपणा की खोटेपणा त्याच्यावर आम्हाला बोलायचे होते. कारण शेवटी अॅकॅडमीक चर्चा झाली तर ओबीसीला न्याय मिळेल. परंतु असे दिसतेय आम्हाला यातून निलंबित करून ओबीसी समाजाला न्याय मिळवू द्यायचा नाही हे षडयंत्र करून निलंबित केले आहे. त्यामागचा आम्हाला डाव असा दिसतोय, २०२२ फेब्रुवारीपर्यंत या महाराष्ट्रातल्या जवळपास ७५ ते ८० टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. तोपर्यंत हा ओबीसी आरक्षणाचा चेंडू हा इकडे तिकडे फिरवायचा आणि ती निवडणूक काढून घ्यायची ओबीसीच्या जागा भरायच्या नाहीत. त्यानंतर ओबीसीचा विचार करायचा हे षडयंत्र महाराष्ट्र शासनाने रचले आहे. आणि म्हणून जो आवाज उठवेल त्याचा आवाज दाबण्याचा कार्यक्रम हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होतोय. पण आम्ही आवाज रस्त्यावर उचलल्याशिवाय राहणार नाही’, असे संजय कुटे म्हणाले.