मुंबई : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार आहे.
आपदग्रस्त शेतक-यांना मंजूर मदत तातडीने वितरीत करण्याचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी 6800 वरून वाढवून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये,बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 500 रूपयांवरन 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर 18 हजार रूपयांवरून 36 हजार रुपये करण्यात आला आहे.जिरायत,बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून प्रती तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे.
अतिवृष्टी,पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३,५०१ कोटींंची मदत वितरित करणार. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीची राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने दिली जाणार मदत. जिरायत शेतीला १३,६००रु, बागायत शेतीला २७ हजार तर बहुवार्षिक शेतीला ३६ हजार रुपये मिळणार pic.twitter.com/jdNzKm2pLs
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 9, 2022
शेतक-यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.याबाबतचा शासननिर्णय मदत व पुनर्वसन विभागाने 8 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केला.