राज्यातील लॉकडाऊन १५ जून पर्यंत वाढण्यात आला असला तरी राज्यात काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनलॉकची प्रक्रिया पाच टप्प्यात सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र अनलॉकची प्रक्रिया कधीपासून सुरु होणार याबाबत राज्यात सावळा गोंधळ सुरु होता. मात्र शनिवारी पहाटे मुख्यमंत्री कार्यालयाकडून महाराष्ट्र अनलॉकच्या सविस्तर सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सोमवार ७ जून पासून राज्यात पाच टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. ((Maharashtra Unlock: process of unlock will start in five stages in Maharashtra state from June 7, see the new rules) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासाकीय पातळीवर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेनुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.
अनलॉकच्या प्रक्रियेत पाच टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ५ जिल्हे, तिसऱ्या टप्प्यात १८ जिल्हे तर चौथ्या टप्प्यात २ दोन जिल्हे आणि पाचव्या टप्प्यात एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. सरकारने लागून केलेल्या पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यांत व शहरात कमीतकमी निर्बंध असतील आणि पाचव्या टप्प्यात असणाऱ्या जिल्ह्यात सर्वाधिक कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली तर त्या जिल्ह्याचा समावेश पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काय आहे अनलॉकची नवीन नियमावली? कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या.
🚨Level of restrictions for breaking the chain 🚨 pic.twitter.com/Vi8WvkDuqi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2021
पहिला टप्प्या
औरंगाबाद,भंडारा,बुलढाणा,चंद्रपूर,धुळे,गडचिरोली,गोंदिया,जळगाव,जालना,लातूर,नागपूर,नांदेड,नाशिक,परभणी,ठाणे,वर्धा,वाशिम,यवतमाळ या १८ जिल्ह्यांचा समावेश आहेत.
काय सुरु काय बंद?
- पहिल्या टप्प्यातील १८ जिल्ह्यांमध्ये मॉल,थिएटर्स आणि सर्व दुकाने सुरळीत सुरु राहतील.
दुसरा टप्पा
अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर,अमरावती,हिंगोली,मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार या ५ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.
काय सुरु काय बंद?
- दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये मॉल्स,थिएटर,रेस्टरंट ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील.
- सार्वजनिक जागा,मैदाने,वॉकिंग ट्रॅक, बांधकाम क्षेत्रातील कामे तसेच कृषी क्षेत्रातील कामे, ई सेवा पूर्णपणे सुरु राहतील.
- जीम,सलून,स्पा,वेलनेस सेंटरही ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील.
- बस सेवा १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील.
- जिल्ह्याबाहेर जाणारी खाजगी वाहने,बसेस त्याचप्रमाणे इतर राज्यात जाणाऱ्या लोकल सेवा,टॅक्सी सुरु राहण्यास परवनागी देण्यात आली आहे.
तिसरा टप्पा
अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात अकोला,कोल्हापूर,बीड,उस्मानाबाद,पालघर,रत्नागिरी,सातारा,सांगली,सिंधुदूर्ग,सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
काय सुरु काय बंद?
- तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील. तर इतर दुकाने ही केवळ सोमवार ते शुक्रवार याच दिवशी सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने शनिवार व रविवारी बंद राहतील.
- दुपारी दोन वाजल्यानंतर जमावबंदी लागू करण्यात येईल.
- हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील. २ नंतर पार्सल सेवा सुरु राहतील.
- खासगी व सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील.
- सामाजिक,सांस्कृतिक,मनोरंजनात्मक कार्यक्रमाला सोमवार ते शुक्रवार दुपारी २ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे.
- सिनेमा चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. इंडोर स्पोर्टंस बंद राहतील.
- सार्वजनिक उद्याने,मैदान,वॉकिंग सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील.
- लग्नासाठी ५० माणसांची उपस्थिती तर अंत्यविधीसाठी २० माणसांना परवानगी देण्यात आली आहे.
- कृषी क्षेत्रीतील कामे,ई कॉमर्स,बांधकाम क्षेत्र दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
चौथा टप्पा
अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.
काय सुरु काय बंद?
- या दोन जिल्ह्यांत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील. इतर दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
- सार्वजनिक उद्याने,मैदान,वॉकिंग सायकलिंग ट्रॅक,स्पोर्ट्स इंडोर सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील.
- थिएटर्स,मॉल पूर्णपणे बंद असतील.
- अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालये २५ टक्के उपस्थितीत तर शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरु राहतील.
- सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नाही. लग्न सोहळ्यात २५ लोकांना परवानगी तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांची उपस्थिती अनिवार्य. राजकीय किंवा इतर बैठकांना ५० टक्के क्षमेतेने उपस्थिती
- सलून,जीम,बस सेवा ५० टक्के क्षमेतेने सुरु राहतील.
- ई कॉमर्स सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध असतील.
पाचवा टप्पा
पाचव्या टप्प्यात एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. पुढील काही आठवड्यात एखाद्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली तर त्या जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यात करण्यात येईल. पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.
हेही वाचा – पुण्यातील कोरोना निर्बंध शिथिलतेबाबत सोमवारी निर्णय होणार – उपमुख्यमंत्री