राज्यासह देशात सध्या कोरोनामुळे २१ दिवसांचा लॉक डाऊन घेण्यात आला असून, १४ एप्रिलला देशातील लॉक डाऊन संपत आहे. मात्र देशातील लॉक डाऊन जरी १४ एप्रिलला संपत असला तरी देखील मुंबई पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊन कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुंबई, पुणे या भागात लॉक डाऊन कायम राहण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या भागात लॉकडाऊन कायम
दरम्यान राज्यात कोरोनाचा बाधितांचा आतापर्यंतचा आकडा ७४८ वर पोहोचला आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून आज सकाळी मुंबईमध्ये ११, पुणे १९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हा आकडा पाहता मुंबई पुणे यासारख्या शहरी भागातील लॉक डाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या भागात किंवा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण नाही, त्या ठिकाणी टाळे बंदी शिथिल करण्याचा सरकारचा विचार आहे.
राज्यातील जिल्ह्याच्या सीमा मात्र बंदच राहणार
दरम्यान राज्यात लॉकडाऊन असताना देखील कोरोना रुग्णाची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही. त्यामुळे जरी राज्यातील काही भागातील लॉक डाऊन शिथिल करण्यात येणार असला तरी जिल्हाच्या सीमा मात्र बंद रहाणार आहेत. विशेष बाब म्हणजे रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी देखील देशातील महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. लॉकडाऊननंतर देशातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवडे सीलच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे.