जून महिना संपत आला तरीही अद्याप राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे आगमन झालेले नाही. राज्यातील अनेक भागांतील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पावसाशिवाय शेतीची कामे खोळबली आहे. दरम्यान पावसाने मुंबई, ठाणे यांसारख्या भागात मध्यम स्वरूपात हजेरी लावली आहे. मुंबईतल्या पावसामुळे मुंबईकरांना क्षणीक दिलासा मिळाला आहे. याशिवाय मुंबई व्यतिरिक्त पावसाने पुणे जिल्ह्यातही हजेरी लावली आहे.तसेच राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे करण्यास सुरूवात केली आहे.
पालघर, वसई भागात पावसाचे आगमन
सध्या राज्यातील पालघर, वसई, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, वाडा, डहाणू, तलासरी या भागांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे.
नवी मुंबई भागात पावसाच्या हलक्या सरी
नवी मुंबई भागातही पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पाणी कपात दूर करण्यासाठी मुसळधार पावसाची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत आहेत.
या भागात ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कोल्हापूर,सातारा भागात पुढील काही तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.तसेच साताऱ्यातील महाबळेश्वर येथे देखील मुसळधार पाऊस झाला आहे.
याशिवाय अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच नाशिक, शिर्डी भागातही मुसळधार पाऊस झाला आहे.