राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासाजनक माहिती समोर आली आहे. पुढील 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे कोकणात मान्सूनसाठी सध्या अनुकूल स्थिती स्थिती निर्माण झाली असून रायगड, खोपोली, सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान कर्नाटकमध्ये रखडलेला मान्सून अखेर कोकणात आगमनासाठी सज्ज झाला आहे. यंदा राज्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज होता मात्र मान्सूनच्या आगमनाला यंदाही उशीर झाला आहे.
दरम्यान कोकणात मान्सूनची चांगली स्थिती पाहता आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दरम्यान राज्यभरातील शेतकरी देखील मान्सूनच्या आगमनाची बाट पाहत आहेत. कोकणात मान्सूनचे आगमन होताच पुढील 4 दिवस मान्सून महाराष्ट्रभर सक्रिय होणार होण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकतील अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे तळकोकणात पुढील 48 तासात मान्सून दाखल होणार आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना अद्याप उष्णतेची लाट सहन करावी लागतेय. अशाच पुढील चार दिवसात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याचे उकाडा चांगलाच वाढला आहे. तर अनेक ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. गोवा, हिंगोली, अमरावती, सातारा, नाशिक, कोकणातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर सोलापूरच्या काही भागातही पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
दरम्यान हिंगोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागांच आणि इतर पिकांच मोठ नुकसान झालं आहे. शेकडो एकर केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात. तर नाशिक मनमाडमध्ये जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांचे मोठे नुकसान झाले. उत्तर रत्नागिरीत मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. काल संध्याकाळी चिपळूण, खेड, दापोलीत पावसानं दमदार हजेरी लावली.