शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोर केल्यानंतर राज्यातील राजकीय नाट्याला सुरूवात झाली. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला सोडल्यानंतर ते मातोश्रीवर दाखल झाले आहेत. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी गृह विभागाने पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
शिवसेनेचे जवळपास ५० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे. या बंडखोरीमुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांना शिवसैनिक लक्ष्य करू शकतात. या आमदारांच्या घरांवर हल्ला होऊ शकतो, असा गुप्तचर विभागाचा अहवाल असल्यामुळे बंडखोरी केलेल्या शिवसेना आमदारांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या घटनेनंतर शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार असून ते काय निर्णय घेणार हे पाहणं मह्त्त्वाचं आहे.
हेही वाचा : शिवसेनेचे ६ आमदार नॉट रिचेबल, मुख्यमंत्र्यांची पुन्हा महत्त्वाची बैठक