नाशिक : लॉकडाऊनच्या काळात शहरातील नागरीक ग्रामीण भागात स्थलांतरीत झाले आहेत. त्यांच्या संक्रमणामुळे करोनाची भिती वाढलेली असली तरी आरोग्य विभागाच्या आशा महिला कर्मचारी कार्यरत असल्याने नाशिक जिल्हा करोना फैलावापासून वाचला आहे. जिल्ह्यातील तीन हजार ‘आशां’वर आरोग्य विभागाची संपूर्ण भिस्त असून, घरोघरी जावून बाहेरील व्यक्तींना होम व्कॉरंटाईन करण्याचे काम आशांनी सुरु केले आहे. या कार्यात स्थानिक नागरीकांनी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.
आशा कर्मचारी घरोघरी जावून बाहेरुन आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करत आहेत. त्यांच्या हातावर शिक्का मारुन त्यांना होम क्वारंटाईन करण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे ग्रामीण करोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होते. जिल्ह्यातील पहिला करोना रुग्ण लासलगाव येथे आढळल्यानंतर परिसरातील नागरीकांमध्ये भिती पसरली होती. या काळात आरोग्य विभागाने सचोटीने काम करत करोनाचा प्रसार रोखला. यात आशा कर्मचार्यांचे महत्वाचे योगदान होते. आजही आशा कर्मचारी गावा-गावात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन सर्वेक्षण करत आहेत. त्यांना सहकार्य करत घरातील व्यक्तींची योग्य माहिती देण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांनी केले आहे.
&
लसिकरण, ‘डिलिव्हरी’ नियमित
सर्वेक्षणाबरोबर इतर सेवा सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नियमित दिल्या जात आहेत. साथीच्या अत्यंत कष्ट काळामध्ये सुद्धा गाव पातळीवरील आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षमतेने काम करीत आहे. नियमित लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचे असते. यात कोणताही खंड पडलेला नाही. त्यामुळे गरोदर माता, बालकांचे विविध आजारांपासून सरक्षण होत आहे. तसेच आरोग्य संस्थेत ‘डिलिव्हरी’ या नियमित होत आहे.