चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर गावाजवळ पेट्रोल टॅंकर आणि ट्रकच्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर भीषण आग लागली. या आगीत ट्रकचे टायर फुटल्याने आग आणखी भडकली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री लाकडाने भरलेला ट्रक चंद्रपूरच्या दिशेने जात होते. तर, डिझेल भरलेला एक टँकर चंद्रपूरकडून येत होता. यावेळी अजयपूरजवळ या दोन्ही वाहनांचा अपघात झाला. या अपघातामुळे एका वाहनात लाकूड व दुसऱ्या वाहनात डिझेल असल्याने भीषण आग लागली.
अपघातातील मृतांची नावे
या अपघाता एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये टँकरमधील चालक-वाहकांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील सात जणांचा या घटनेत मृत्यू धाला. ट्रकमधील ७ जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. चालक अक्षय सुधाकर डोंगरे (30) बीटीएस प्लॉट बल्लारशा, मजूर प्रशांत मनोहर नगराळे (28), कालू प्रल्हाद टिपले (35), मैपाल आनंदराव मडचापे (24),बाळकृष्ण तुकाराम तेलंग (40),साईनाथ बापूजी कोडापे (35), संदीप रवींद्र आत्राम (22) सर्व राहणार दहेली व टँकरचालक हाफिज खान (38) अमरावती, मजूर संजय पाटील (35) वर्धा अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मूल-चंद्रपूर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, ही आग भीषण असल्यामुळे या आगीत मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांची राख झाली आहे. तसंच, या अपघातामुळे संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने मूल व चंद्रपूर मार्गावरील वाहतूक खंडित झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
चंद्रपूर,बल्लारशा, सीटीपीएस चंद्रपूर, पोंभूर्णा, मुल येथून अग्निशमन वाहन बोलाविण्यात आले. आग आटोक्यात आली असली तरी आज सकाळी 9 वाजेपर्यंत टँकर जळतच होता. सकाळीच अग्निशमन गाडीने पुन्हा आग विझवण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून सर्व जळालेले मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा – पुण्यातील ‘या’ दोन धरणांत बुडून नऊ जणांचा मृत्यू