गेले काही दिवस राणे कुटुंब आणि शिवसेना संघर्ष पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी राणेंविरोधात आंदोलन करत संताप व्यक्त केला. या सगळ्या घडामोडी घडलेल्या असताना भाजपचे आमदार आणि नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंमध्ये हाडवैर नसून ते बनवलं गेलं, असा दावा नितेश राणे यांनी केला.
नितेश राणे यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देत उद्धव ठाकरे-राणेंमध्ये हाडवैर नसून ते बनवलं गेल. ज्यांनी हे केलं ती माणसं उद्धव ठाकरेंच्या लक्षात आली तर उद्धव ठाकरेंचं भलं होईल, असं नितेश राणे म्हणाले. पुढे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीची देखील माहिती दिली. कोरोना काळात आमच्या रुग्णालयाच्या उद्धाटनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची शेवटची भेट झाली, असं नितेश राणे यांनी सांगितलं.
शिवाय, मी आणि आदित्यही एकदा भेटलो होतो. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुळात राणेसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलं नातं होतं. आम्ही तेजस, आदित्य बरोबर खेळलो आहे. परंतु संजय राऊत, सुभाष देसाई आणि अनिल परब यासारखी काही मंडळी आहे. ज्यांना हे नकोय. राणे-राज-उद्धव एकत्र असते तर आज महाराष्ट्रासाठी वेगळं चित्र असतं. उद्धव ठाकरेंना कोण जवळचं आहे हे ओळखता आलं तर आदित्य आणि शिवसेनेसाठी चांगलं आहे, असं नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा – ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सेनेला धक्का, भाजपमध्ये जाणाऱ्यांची यादी तयार’