बीडमधल्या सत्ताकेंद्रावरून गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघा भावा-बहिणीमध्ये सुरू असलेला वाद आता बीडबाहेर आख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. यावरून दोघेही एकमेकांवर नेहमीच टीका करताना किंवा एकमेकांबद्दल तक्रारी करताना दिसतात. मात्र, आता पंकजा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडेंसाठी राजकारण सोडण्याची भाषा केली आहे. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीवर झालेल्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांचे भाजपा कार्यकर्ते आणि धनंजय मुंडेंचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, या दोघांच्या भुवया उंचावल्या आहेत.
का सोडलं असतं पंकजा मुंडेंनी राजकारण?
धनंजय मुंडेंबाबत यावेळी पंकजा मुंडेंनी मनमोकळेपणाने त्यांची भूमिका मांडली. ‘बाबा(गोपीनाथ मुंडे) तेव्हा सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी धनंजयला सुद्धा आमदार केलं मीसुद्धा बाबांच्या आग्रहामुळे राजकारणात आले. पण एवढं सगळं होऊनसुद्धा तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. तो जर आजही भाजपमध्ये असता, तर त्याच्यासाठी मी स्वत: राजकारण सोडलं असतं’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, ‘सगळीकडेच आणि सगळ्याच कुटुंबात वाद होत असतात. पण चर्चा मात्र मुंडे कुटुंबावरच जास्त होते’, अशी नाराजी देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
हे काय म्हणाल्या पंकजा मुंडे? – ‘धनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते’
गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं गूढ
यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबद्दल लंडनमधल्या हॅकर शुजा अहमदने केलेला दावा फेटाळून लावला आहे. ‘बाबांचा मृत्यू हा अपघातच होता हे पोलिसांनी आणि सीबीआयने देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हॅकरने सांगितलेल्या गोष्टीमध्ये कोणतंही तथ्य नाही’, असं त्यांनी आग्रहाने सांगितलं. ‘गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात नसून त्यांची हत्याच करण्यात आली होती आणि इव्हीएम मशिनमध्ये भाजपने केलेल्या घोटाळ्याबद्दल त्यांना कळल्यामुळेच त्यांची हत्या झाली’, असा दावा शुजा अहमदने काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावरून बराच राजकीय आणि सोशल मीडिया वाद निर्माण झाला आहे.