घरमहाराष्ट्रअमानुष ! पोटच्या मुलाला दोन वर्ष कोंडले २२ कुत्र्यांसोबत, पुण्यातील घटना

अमानुष ! पोटच्या मुलाला दोन वर्ष कोंडले २२ कुत्र्यांसोबत, पुण्यातील घटना

Subscribe

शाळा सुरू झाल्यानंतर या मुलाला शाळेत पाठवले गेले. पण तो कुत्र्यासारखे वागू लागला. तो  इतर मुलांना चावू लागला. त्यामुळे पालकांनी त्याला घरात डांबून ठेवले होते. त्याला यामधून बाहेर काढले गेले तेव्हा तो आकाशाकडे तसेच इतर वस्तूंकडे आश्चर्याने पाहत होता.

पोटच्या मुलालाच तब्बल २ वर्षे २२ कुत्र्यांसोबत घरात कोंडल्याचा अमानुष प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. अत्यंत घाणीच्या, अस्वच्छतेच्या ठिकाणी हा ११ वर्षीय मुलगा या कुत्र्यांसोबत अडकला होता. सोसायटीतल्या एका जागरूक रहिवाशाच्या ही बाब लक्षात आल्याने या मुलाची सुटका झाली. या मुलाच्या आई – वडिलांवर कोंढवा पोलिसांनी बाल संगोपन आणि संरक्षण न्याय कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक म्हणजे दोन वर्ष कुत्र्याच्या पिलांच्या सहवासात राहिल्याने मुलगाही कुत्र्यांप्रमाणे वागू लागला आहे. हा मुलगा पालकांसह कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होते. या ठिकाणीच त्याला पालकांनी कुत्र्यांसोबत कोंडून ठेवले होते. सोसायटीतल्या एका रहिवाशाच्या हा प्रकार लक्षात आला. या रहिवाशाने चाइल्डलाइन फाउंडेशनला कॉल करून याची माहिती दिली. त्यानंतर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या घरी भेट देऊन पालकांना तंबी दिली आणि निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा या घरी गेले. त्यावेळी घराला कुलूप लावल्याचे दिसले. कार्यकर्त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता हा मुलगा कुत्र्यांच्या कळपामध्ये एकटाच बसल्याचे दिसले.  त्यानंतर त्यांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली.

- Advertisement -

बालकल्याण समितीने पोलिसांच्या सहाय्याने या मुलाची सुटका केली आहे. योग्य पोषण न मिळाल्याने हा मुलगा अशक्त झाला असून त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. त्याचे आई-वडील घरी जेवण बनवत नव्हते. त्यांच्या घरी स्वयंपाकासाठी सिलिंडरही नव्हता. व्यवसाय बंद पडल्याने त्याचे पालक बेरोजगार आहेत. घरामध्ये कुत्र्यांनी घाण केल्याने दुर्गंधी पसरली होती. यामधील दोन कुत्रीही मेली होती. तर मुलाला अनेक दिवस अंघोळ घातलेली नव्हती, असे ज्ञान देवी चाइल्डलाइनच्या संचालिका अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितले. कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की, मुलाची घरातून सुटका करणे मोेठे आव्हान होते. ही सर्व कुत्री भटकी होती. त्यांची नसबंदी झालेली नव्हती.ती केव्हाही हिंस्र रूप धारण करू शकत होती.

अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, शाळा सुरू झाल्यानंतर या मुलाला शाळेत पाठवले गेले. पण तो कुत्र्यासारखे वागू लागला. तो  इतर मुलांना चावू लागला. त्यामुळे पालकांनी त्याला घरात डांबून ठेवले होते. त्याला यामधून बाहेर काढले गेले तेव्हा तो आकाशाकडे तसेच इतर वस्तूंकडे आश्चर्याने पाहत होता. त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या  मुलगा कुत्र्यासारखा वागत असून त्याला योग्य समुपदेशनाची गरज आहे. त्याच्या पालकांकडे आम्ही त्याला परत देऊ शकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -