देशातील नवीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्वस्थतता पुर्णपणे दिसून आली. देशवासीयांना संबोधन करताना ५९ सेकंदांमध्ये पंतप्रधानांची झालेली चलबिचल ही दिसून आली. मोदींनी आपल्या भाषणामध्ये ”क्षमा, तपस्या, पवित्र ह्दय, प्रकाश जैसा सत्य, किसान भाइयों समझा नही पाया,” असे सांगत त्यांनी आपण शेतकऱ्यांना कृषी कायद्यांचे महत्व सांगण्यात अपयशी ठरल्याचे सांगितले. त्यांची कायदे मागे घेण्याची वेदना याच वाक्यातून समोर आली. जेव्हा २०१४ मध्ये नेतृत्व मिळाले तेव्हापासून राष्ट्र सेवेच्या जबाबदारीत सर्वाधिक चिंता ही शेतकऱ्यांचीच केली आहे. सर्वाधिक शेतकऱ्यांची चिंता केली, पण शेतकऱ्यांनी मात्र विश्वास ठेवला नाही, असेच काहीसे मोदी सांगण्याचा प्रयत्न करत होते.
नेमक काय म्हणाले मोदी ?
‘साथियों, मैं देशवासियों से क्षमा मांगते हुए, सच्चे मन से और पवित्र हृदय से कहना चाहता हूं कि शायद हमारी तपस्या में ही कोई कमी रह गई होगी जिसके कारण दीये के प्रकाश जैसा सत्य, कुछ किसान भाइयों को हम समझा नहीं पाया। आज गुरु नानकदेव जी का प्रकाश पर्व है। यह समय किसी को भी दोष देने का नहीं है। आज मैं आपको, पूरे देश को यह बताने आया हूं कि हमने तीन कृषि कानूनों को वापस लेने का निर्णय लिया है।’
कृषी कायदे पटवून देण्यात अपयश
शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबाबत समजावून सांगता आले नसल्याची धडपड त्यांच्या वक्तव्यातून समोर आली होती. पंतप्रधान म्हणाले की, आमचे सरकार शेतकरी कल्याणासाठी विशेषतः छोट्या शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच देशातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि, देशाच्या हितासाठी, गाव तसेच गरीबांच्या उज्वल भविष्यासाठी पूर्ण सत्य निष्ठेने, शेतकऱ्यांसाठीच्या समर्पण भावाने, अतिशय प्रामाणिक मनाने कृषी कायदे घेऊन आले होते. पण इतकी पवित्र गोष्ट, पूर्ण रूपाने शुद्ध असूनही, शेतकऱ्यांच्या हितासाठीची गोष्ट आम्ही अनेक प्रयत्नांनंतरही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. या प्रक्रियेत कृषी अर्थशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, प्रगतिशील शेतकरी यांनीही कृषी कायदे समजावण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
संसदेच्या अधिवेशनात रद्द होणार कृषी कायदे
पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द होण्याच्या प्रक्रियेबाबतही आजच्या भाषणात स्पष्टीकरण दिले. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातच हे कृषी कायदे मागे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनातच हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात येतील असेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांपासून संपुर्णपणे लक्ष काढून घेत, या प्रक्रियेत कोणताही उशिर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आपल्या भाषणातही त्यांनी यंदाच्या हिवाळी अधिवेशनातील सत्रामध्ये आपण तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबतची संविधानिक प्रक्रियाही यंदाच्या अधिवेशनात पूर्ण करू असेही ते यावेळी म्हणाले.