मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करतेय, त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणालेत. विशेष म्हणजे त्यांनी एवढ्या गंभीर चुकीसाठी व्हिडीओ ट्विट करत फक्त दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितलीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करतेय, त्याचा मी निषेध करतो. ज्या भावनेतून जो कार्यक्रम आम्ही केला आहे. स्वराज्य कोकण भूमी त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं. तसेच माझी चूक देखील मी सुधारली होती. तुम्ही व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापना ही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला, असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय जाधवरावांनीदेखील म्हटलं, असंही प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे.
तेसुद्धा मीडियात आलेलं आहे. परंतु तरीदेखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करीत आहे. त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असंही प्रसाद लाड म्हणालेत.
छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. pic.twitter.com/Nyps1jqs7U
— Prasad Lad (@PrasadLadInd) December 4, 2022
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदाराने केलं आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात बोलताना महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं म्हणाले. स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल. पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला,” असं प्रसाद लाड म्हणाले. त्यांच्या तोंडून कोकण शब्द बाहेर येताच बाजूला असलेल्या पदाधिकाऱ्याने ‘महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला, असं त्यांनी सांगितलंय.
हेही वाचाः शिवरायांवरून भाजपाचा नेता पुन्हा बरळला, म्हणे महाराजांचा जन्म कोकणातला!