मणिपूरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांसह राजकीय वर्तुळातून देखील त्यावर प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांकडून मणिपूरचा प्रश्न घेण्याबाबत अध्यक्षांकडे विचारणा करण्यात आली. परंतु अध्यक्षांनी हा प्रश्न मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळाच्या प्रांगणात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ही घटना 4 मे रोजी घडली. या घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातून पंतप्रधानांच्या कार्यालयात गेली. पंतप्रधानांचा अतिशय महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय दौरा होता. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ताबडतोब इंटरनेट बंद केलं. त्यामुळे ही घटना कुणाला कळली नाही. अडीच महिन्यानंतर या घटनेवर एफआयआर दाखल झाला आहे. कुणीतरी ती क्लिप बाहेर आणली. दडपून टाकण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला गेला. मोदींनी अडीच महिने यावर एक अवाक्ष:र देखील काढलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मोदी पहिल्यांदा बोलले, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने कुठलाही खटला नसताना या घटनेची सुमोटो दखल घेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान उघडले आहेत. त्यामुळे पीएम मोदींना अडीच महिन्यानंतर बोलावं लागलं. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना सुमोटोची दखल घ्यावी असं वाटलं. परंतु हा प्रश्न विधानसभेत घेण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांना काहीही हरकत नव्हती. त्यामुळे या घटनेचा आम्ही निषेध करतो, असंही चव्हाण म्हणाले.