घरमहाराष्ट्रगावकर्‍यांचा विरोध न जुमानता पुणे-मुंबईकरांनी गाठले कोकण

गावकर्‍यांचा विरोध न जुमानता पुणे-मुंबईकरांनी गाठले कोकण

Subscribe

राज्यात सध्या करोनाचे संकट असून, येत्या काळात मुंबई-पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यातील करोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे हे दोन्ही भाग सध्या रेड झोनमध्ये आहेत. याचमुळे या भागातील लोकांना कोकणात घेण्यास विरोध होत असताना आता गावकर्‍यांचा विरोध न जुमानता मुंबई-पुण्यात अडकलेल्या चाकरमान्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे कोकणात जायला सुरुवात केली आहे.

मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांना कोकणात घेऊ नका यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक पत्र राज्य सरकारला लिहिली गेली होती, तर काहींनी मुंबई- पुण्यातील लोकांना गावी सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, आता करोनामुळे हतबल झालेल्या चाकरमान्यांनी गावकर्‍यांचा विरोध न जुमानता रीतसर परवानगी घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला आहे. मुंबईकर मुंबई-गोवा महमार्गाने तर पुण्यातील चाकरमानी सांगली, सातारा, कोल्हापूर मार्गे तळ कोकणात पोहोचले आहेत.

- Advertisement -

खारेपाटण येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मागील दोन ते तीन दिवसांपासून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचे प्रमाण वाढले असून, स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या घेऊन मुंबई- पुण्यातील अनेकजण कोकणात जायला निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा-महामार्गावरील खारेपाटण येथे चार ते पाच किलोमीटर अंतरावर लांबच लांब वाहनांच्या रांगा पहायला मिळत असून, चार ते पाच तास एकाच जागी वाहने थांबत आहेत. मुंबईतून येणार्‍या चाकरमान्यांची सध्या खारेपाटण येथे मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनाकडून तपासणी करून त्यांना त्यांच्या तालुक्यामध्ये सोडले जात आहे.

जिल्ह्यातील शिक्षकही लागले कामाला

मोठ्या प्रमाणात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या मदतीने कॉरंटाईनसाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात असून, सध्या गावामध्ये शाळा, हायस्कूल, गावातील एखादे मोकळे घर या ठिकाणी लोकांची त्या त्या गावात व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना देखील कामाला लावले असून, शिक्षक सध्या शाळेमध्ये सकाळी १० ते ५ ड्युटी करत शाळेमध्ये पहारा देत आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे सकाळी १० ते ५ या वेळेमध्ये शिक्षक शाळा हायस्कूलमध्ये पहारा देत असून, रात्री कोण शाळेत थांबणार यावरून देखील सध्या गावागावामध्ये वादविवाद सुरू आहेत. शिक्षकांनीच २४ तास शाळेमध्ये थांबावे असे सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे अवघ्या दोन ते तीन दिवसात मुंबईतून कोकणात परतलेल्या चाकरमान्यांमुळे स्थानिक प्रशासनाची पुरती दमछाक उडाली असून, जर चाकरमान्यांचे प्रमाण वाढले तर त्यांच्या कॉरंटाईनची व्यवस्था तरी कुठे करायची हा प्रश्न आता निर्माण झाला आहे, तर काही गावामध्ये अजूनही मुंबईकरांना गावी घेण्यास विरोध होत असल्याचे समोर येत आहे.

देवगडमधील तरुणीला झाला त्रास

खारेपाटण येथे अनेकांना कॉरंटाईनचे शिक्के मारून तालुक्यामध्ये सोडले जात असताना आता देवगड येथे राहणार्‍या एका मुलीच्या हातावर मारलेल्या कॉरंटाईनच्या शिक्क्यामुळे त्रास झाला आहे. या तरुणीच्या हातावर जो शिक्का मारला गेला त्यासाठी जी शाई वापरण्यात आली ती निवडणुकीच्या काळात वापरण्यात येणारी शाई वापरली गेल्याचा आरोप होऊ लागला असून, याचमुळे दुसर्‍या दिवशी या तरुणीचा हात सुजला आणि तिच्या हातावर फोड देखील आल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, ही बाब भाजप आमदार नितेश राणे यांच्या लक्षात येताच त्यांनी हाताला फोड आलेला फोटो स्वतःच्या ट्विटवर टाकून सरकारचे काम हे लोकांना दुखवणारे असल्याची त्यांनी टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -