Balasaheb’s Shiv Sena and PRP announced alliance | मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होऊन २४ तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीची घोषणा करून ठाकरे गटाला शह दिला. एकनाथ शिंदे आणि प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. त्यामुळे निवडणुकीत शिंदे यांच्या भगव्या झेंड्याला निळ्या झेंडाची साथ लाभणार आहे.
प्रा.कवाडे हे संघर्षातून पुढे आलेले नेते आहेत. त्यांनी कारावास भोगला आहे. लाठया-काठया खाल्या आहेत. आम्हीपण संघर्षातूनच इथपर्यंत आलो आहोत. दीन-दलित,पीडितांना न्याय देण्यासाठी ते कार्यरत राहिले आहेत. प्रा.कवाडे हे सुशिक्षित आणि अभ्यासू नेते आहेत. त्यांनी आंदोलने करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी त्यांना वीस जिल्हयांत भाषण करायचीही बंदी होती. यावरून ते किती आक्रमक नेते आहेत हे लक्षात येते. कवाडे यांनी गोरगरिब, शोषित, पीडित, दलित समाजाला न्याय देण्यासाठी आंदोलने केली. पोलिसांच्या काठया खाल्या. तिहार जेलमध्येही ते होते. त्यांनी जगातील तीन क्रमांकाचा ठरेल असा लाँग मार्च काढला, अशा शब्दात कवाडे यांचा गौरव करताना शिंदे यांनी आता त्यांचा लाँगमार्च योग्य ठिकाणी आल्याचे सांगितले.
बाळासाहेबांची शिवसेना आणि पीआरपीची युती झाल्याचे सांगून प्रा.कवाडे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धाडसी निर्णय घेतला. हे गतीमान सरकार आहे. मी राज्यभरात फिरत असतो,राज्यातील जनतेचीही हीच भावना आहे. शाहू,फुले,आंबेडकर आणि प्रबोधनकार यांच्या सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा विचार असणार आहे. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणे, भेदभाव न करता गोरगरिबांच्या हितासाठी काम करणे हे सरकारच्या माध्यमातून होणार आहे.
अजितदादांनी माफी मागितली पाहिजे
दरम्यान, छत्रपती संभाजीमहाराज हे धर्मवीर होतेच. त्यांना ही पदवी काही तुम्ही-आम्ही दिलेली नाही. आधीपासूनच त्यांना धर्मवीर म्हटले जाते. औरंगजेब हा अत्याचारीच होता. त्याने मंदिरांना हानी पोहोचवली. त्यामुळे अजित पवार यांचे वक्तव्य हे त्यांना न शोभणारे असून ते निंदाजनक आहे. महापुरुषांच्या अवमानाबद्दल जशी माफी मागावी अशी मागणी होते तशीच अजितदादांनी पण या वक्तव्याबददल माफी मागावी, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.