काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या परवानगीशिवाय अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होता. यावरून सध्या अमरावतीमध्ये राजकारण पुन्हा तापले आहे. महापालिकेच्या या कारवाईचा निषेध करत आज, बुधवारी अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर काही अज्ञातांनी शाईफेक केल्याचे समोर आले आहे. यादरम्यान हे अज्ञात लोकं ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत होते. यामध्ये काही महिलांचा देखील समावेश होता. याप्रकरणाचा पोलिसांकडून आता तपास केला जात आहे.
माहितीनुसार, अमरावतीच्या राजपेठ उड्डाणपुलाच्या खाली अंडर बायपास बनवला आहे, त्या ठिकाणी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकरांवर शाईफेक केल्याची घटना घडली आहे. काही अज्ञातांनी मनपा आयुक्तांना या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यासंदर्भात फोन केला होता. राजपेठ उड्डाणपुला खालच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, तुम्ही याची पाहणी करावी आणि विल्हेवाट करावी, असे फोनवरून मनपा आयुक्तांना सांगण्यात आले होते.
त्यानुसार अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. पाहणी करताना काही पाच ते सहा अज्ञातांनी त्यांच्यावर शाईफेक केली. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण त्यावेळी अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात मनपा आयुक्तांवर शाईफेक करून तिथून पळ काढला. दरम्यान आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे. सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित झाले असून नेमके शाईफेक करणारे कोण होते? याचा तपास केला जात आहे. पण हे अज्ञात लोकं शिवप्रेमी असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा – अनिल बोंडेंचे विचार गोडसेचे, नाना पटोलेंचं भाजपला खोचक प्रत्युत्तर