राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राईव्ह सादर करून राज्य सरकारवर गंभीर आरोप करण्याचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेनड्राईव्ह सादर करून राज्य सरकारवर आरोप केला होता. त्यानंतर काल, गुरुवारी भाजप आमदार नितेश राणे यांनी आणखीन एक पेनड्राईव्ह असल्याचे सांगत कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी बोलत असताना भाजपला इशारा दिला. राऊत म्हणाले की, ‘तुमच्या १०० पेनड्राईव्हऐवजी आमचा एकच कव्हर ड्राईव्ह तुमच्यावर भारी पडेल.’
‘आधी तुरुंगात टाका, मग आमच्यावर आरोप लावा’
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची जी हातमिळवणी, मिली भगत सुरू आहे. त्यातून असे दिसतेय की, महाराष्ट्रातील सरकार त्यांना चालवू द्यायचे नाहीये. त्यांना हे सरकार खोट्या प्रकरणातून उद्ध्वस्त करायचे आहे. खोटे विषय निर्माण करून हे सर्व सुरू आहे. याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू. आमच्यावरती कोणते आरोप आहेत हे आम्हाला माहित नाही, हे आरोपपत्र परस्पर तयार करतात. ज्यांना, ज्यांना तुम्हाला तुरुंगात टाकायचे आहे, त्याची यादी तयार करा आणि केंद्रीय तपास यंत्रणांना सांगा. महाराष्ट्रातील या २५ लोकांना आम्हाला तुरुंगात टाकायचे आहे. आधी तुरुंगात टा,का मग आमच्यावर आरोप लावा. काही हरकत नाही. तुमचा महाराष्ट्रद्रोहीचा आत्मा शांत करा.’
‘रोज यांच्या घरात पेनड्राईव्ह बाळंत होतात का?’
राज्यातील नेत्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत पुढे राऊत म्हणाले की, ‘या कू पद्धतीच्या, घाणेरड्या पद्धतीच्या कारवाया होत आहेत. याला पद्धत म्हणत नाहीत, तर याला सूड, बदला याच्याशिवाय या कारवायाना दुसरा शब्द वापरता येणार नाही. महाराष्ट्रात नीच आणि इतक हलकट पातळीवरच राजकारण या महाराष्ट्रात कधीच झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागण्याचा सल्ला दिला होता. तसेच महाराष्ट्रातील साधूसंतांचा, देवदेवतांचा असा एक संदेश, मंत्र आहे की, शत्रूविषयी सन्मानाने वागले पाहिजे. आम्ही काय पाकिस्तानमधून आलोय? उलट तुमचे संबंध आहेत. यांच्या घरात पेनड्राईव्ह रोज बाळंत होतात का? हे बघाव लागेल. हा पेनड्राईव्ह, तो पेनड्राईव्ह आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू. नुसत बोंबलून चालत का? रोज एक खोटे, भपंक प्रकरण तयार करतात. हे बाळंतपण कसे काय यांना जमते माहित नाही. महाराष्ट्रात हे नवीन आहे. देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात रिसर्च करण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्या १०० पेनड्राईव्हनंतर आमच्या एक कव्हर ड्राईव्ह येईल तो तुम्हाला भारी पडेल.’
‘यांना दाऊद आणि पाकिस्तानने सुपारी दिली’
मुंबई पोलीस दलातील निवृत्ती इसाक बागवान यांच्या प्रकरणासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, कोणावरही काहीही आरोप करायचे आणि महाराष्ट्रातील पोलीस दलाचे मनोबल खचीकरण करायचे. लोकांच्या घरात शिरू नका. मी परत परत सांगतो. तुम्हालाही घर आहे. बागवान यांच्याविषयी मी लिखान केलेय, अनेकांनी केलेय. त्यांचे अलीकडे पुस्तक आले आहे, तेही तुम्ही वाचले पाहिजे. २६/११च्या हल्ल्यात त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून जो इस्रायली मुलगा होता, त्याचा जीव वाचवला. त्यासाठी इस्रायल सरकारने देखील त्याचे कौतुक केले आहे. तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांचे, प्रशासनाचे ज्या प्रकारे खच्चीकरण करताय. हे सगळे खच्चीकरण करण्यासाठी या लोकांना दाऊदने, पाकिस्तानने सुपारी दिली आहे. अल कायद्याचा अजेंडाच हा होता. काही लोकांना हाताशी पकडायचे त्यांना सुपारी द्यायची आणि देशाच्या आणि राज्याच्या प्रशासनाला सुरुंग लावायचा हा अल-कायद्याचा अजेंडा हा होता खोटे आरोप करायचे. हाच अल-कायद्याचा अजेंडा हे राबवतायत.
हेही वाचा – Nitesh Rane : कोल्हापुरातील रुग्णालयात माझ्या हत्येचा कट रचला, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ