मुंबई – विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशाचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सत्ताधारी- विरोधक आमनेसामने आले. अनेकदा सभागृह तहकूब करावं लागलं. तर, विरोधकांनी सभात्याग करत निषेध व्यक्त केला. आता शनिवार, २५ मार्च रोजी या अधिवेशाचे सूप वाजणार आहे. त्यामुळे आज विरोधक अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करणार आहेत.
अधिवेशन सुरू झाल्यापासून विविध मुद्द्यांवरून सभागृह गाजले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटल्याने पहिल्या दोन दिवस याचे पडसाद सभागृहात उमटले. यावरून सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यावरून सभागृह पेटले. विरोधकांनी यावरून सभात्यागही केला. आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने पंचनामे होऊ शकले नाहीत. दुसरीकडे नाशिकहून अनेक शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, सरकारी संप आणि शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यात सरकारला यश आले. परंतु, दोघांच्या मागण्या पूर्णतः मान्य न झाल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आजच्या सभागृहात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई यावर विरोधक चर्चा करण्याची शक्यता आहे.
राज्यातील कायदा, सुव्यवस्था यावर विरोधक चर्चा करणार आहेत. तर, विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्तवाही आज येणार आहे.