मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी एका कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत परखड मत मांडले. माझ्यासाठी सर्वजण एक आहेत, त्यांच्यात जात-वर्ण नाही, पण पंडितांनी श्रेणी निर्माण केली असल्याचे सांगत मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेसाठी पंडितांना जबाबदार धरले.
मुंबईत संत रोहिदास जयंती सोहळ्यात सरसंघचालक भागवत बोलत होते. प्रत्येक काम समाजासाठी असते, तर कोणी उच्च, कोणी नीच किंवा कोणी वेगळे कसे होऊ शकतात? केवळ स्वत:चाच विचार करणे आणि आपलीच उपजीविका करणे एवढाच धर्म नाही. समाजाप्रती देखील आपली जबाबदारी आहेच. सत्य हेच ईश्वर आहे… नाव, पात्रता आणि सन्मान काहीही असले तरी सर्व समान आहेत आणि त्यात काहीही फरक नाही… काही पंडित धर्मग्रंथांच्या आधारे जे म्हणतात ते खोटे आहे…, असे सरसंघचालक म्हणाले.
‘मैं सब प्राणियों में हूं ।इसलिए रूप नाम कुछ भी हो ,लेकिन योग्यता एक है,मान सम्मान एक है,सबके बारे में अपनापन है ।कोई भी ऊंचा नीचा नहीं है ।’
परमपूज्य सरसंघचालक @DrMohanBhagwat जी। pic.twitter.com/aOmGpjw9Ro— Prof Rakesh Sinha MP (@RakeshSinha01) February 6, 2023
संत रोहिदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात एकोपा निर्माण करण्याचे काम केले. संत रोहिदास यांनी देश आणि समाजाच्या विकासाचा मार्ग दाखला. समाजाला बळकटी देऊन त्याला पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेली परंपरा त्यांनी दिली. जाती-जातीच्या श्रेष्ठतेच्या कल्पनेमध्ये तसेच उच्च-नीचतेच्या भोवऱ्यात अडकून आपण भ्रमिष्ट झालो आहोत. याला अन्य कोणी जबाबदार नाही. आपल्याला हा भ्रम दूर करायचा आहे. समाजातील आत्मीयता संपते, तेव्हा स्वार्थ मोठा होतो, असे त्यांनी नमूद केले.
आमच्या समाजातील विभाजनाचा फायदा इतरांनी घेतला. याचाच फायदा घेऊन आपल्या देशात आक्रमण झाले आणि बाहेरून आलेल्या लोकांनी फायदा घेतला. तुलसीदास, कबीर, सूरदास यांच्यापेक्षा संत रोहिदास श्रेष्ठ होते, म्हणूनच संत शिरोमणी होते, असे सरसंघचालक भागवत म्हणाले. शास्त्रासंबंधीच्या वादविवादात जरी ते ब्राह्मणांवर विजय मिळवू शकले नाहीत, पण त्यांनी लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आणि विश्वास दिला की, देव आहे. देशातील हिंदू समाज नष्ट होण्याची भीती आहे. ही गोष्ट तुम्हाला कोणताही पंडित सांगू शकत नाही, ती तुम्हाला स्वतःला समजून घ्यावी लागेल, अशी पुस्तीही सरसंघचालक भागवत यांनी जोडली.
हेही वाचा – नाणार भोवतालच्या जमिनी घेतलेल्यांची नावं जाहीर करा, अन्यथा…; राऊतांच शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान