रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने तब्बल ५९ कोटी ३६ लाखांचा दंड वसूल केला आहे. हा आकडा बघून तुमचे ही डोळेही पांढरेच झाले असतील. पण हा आकडा मध्य रेल्वेकडून देण्यात आला आहे. मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांविरोधात राबविलेल्या मोहिमेत विनातिकीट आणि बेकायदेशीर सामानाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांकडून ही रक्कम वसूल केली आहे.
दंडाची ३४ टक्क्यांनी झाली वाढ
मध्य रेल्वेवर जून २०१८ मध्ये फुकट्या प्रवाशांकडून ५९ कोटी ३६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये ३४.६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जून २०१७ मध्ये फुकट्या प्रवाशांच्या २.५८ लाख प्रवासी होते. एप्रिल २०१८ मध्ये १०.८५ लाख विनातिकीट करणारे प्रवासी पकडले होते. त्यांच्याकडून ५४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विनातिकीट प्रवास टाळा!
दंडाचा आकडा पाहता ‘प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करु नका’, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेकदा टीसी नसतील, तिकीट काढले नाही तरी चालेल किंवा लहान मुलांचे तिकीट न काढता अनेक जण प्रवास करतात. अशा प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो. त्यांना कोणत्याही सबबीखाली सोडले जात नाही. त्यामुळे ‘विनातिकीट प्रवास करणे टाळा’, असे आवाहन करण्यात आले आहे.
कसा आकारला जातो दंड?
- २६० रुपये (दंड) + तिकीटाचे पैसे ( तुम्ही कुठून चढलात आणि तुम्हाला टीसीने कोणत्या स्टेशनला पकडले? त्या स्थानकादरम्यानचा तिकीटाचा दर. फर्स्ट आणि सेंकड क्लाससाठी हाच नियम आहे. पण तिकीटांच्या दरानुसार हा दंड वाढतो)
- टीसीने पकडल्यानंतर जर तुम्हाला ट्रेनमधून उतरायचे नसेल तर किमान २६०रुपये +ज्या स्टेशनला तुम्हाला उतरायचे आहे तो तिकीटाचा दर दंड रुपात भरावा लागतो. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या पावतीवरुन प्रवास करता येतो.
- प्लॅटफॉर्मवर सोडायला आलो या सबबीखाली प्लॅटफॉर्म तिकीट न बाळगणाऱ्यांना देखील दंड भरावा लागतो. २५० रुपये+प्लॅटफॉर्म तिकीटाचे पैसे