महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने काढलेले पुस्तक वाचले. त्यामधील मुख्यमंत्र्यांचा संदेश पाहिला. अतिशय चांगला संदेश आहे. कुठेही विसंवाद नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कुठेही विसंवाद नाही, मतभेद नाही असे मुख्यमंत्री म्हणतात तर आश्वासन दिलेल्या वीजबिल सवलतीचे काय झाले असा सवाल विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केला. आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलताना त्यांनी ही टीका राज्य सरकारवर केली.
वीजबिल सवलतीची घोषणा करताना ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी चर्चा केली नव्हती असे वृत्तपत्रात वाचायला मिळाले. त्यानंतर चर्चा झाली होती पण अजितदादा सवलत देण्यासाठी नाही म्हणाले. त्यानंतर आठवेळा मुख्यमंत्र्यांना फाईल पाठवली असे नितीन राऊत यांनी सांगितले. पण संपुर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. यावरूनच दिसते आहे की या सरकारमध्ये एकमेकात किती सुंदर संवाद आहे. हा कुठला संवाद आहे असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. तुम्ही एकमेकाची डोकी फोडा पण जी तुम्ही सरकार म्हणून आश्वासने दिली ती तरी पुर्ण करा अशी टीका फडणवीस यांनी केली. मोफत वीज देणार तुम्ही म्हणाला होता त्याचे काय झाले असाही प्रश्न त्यांनी यावेळी केला. एमएसआरडीसी आणि पीडब्ल्यूडी यांच्यात काय वाद आहे ? दादा भुसे आणि बंटी पाटील यांच्यात अॅग्री युनिवर्सिटीच्या निमित्ताने काय वाद आहे ? हे सगळ आम्हाला पेपरला वाचायला मिळते. गरीबांची बिले वाढवून दिली. दारिर्द्य्र रेषेखालील वीज ग्राहकांचेही पैसे वाढवले. वीज वापरली तर भरावी लागेल ही भूमिका मान्य आहे. पण दारिद्रय रेषेखालील ग्राहकांनाही वीजबिल वाढवता असा प्रकार समोर आला आहे. सरकारने घोषणा करून केलेली ही जनतेची फसवणुक असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. अनेक वीज ग्राहकांना जानेवारी ते मार्च या कालावधीत तिपट्टीने वीजबिले आल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. राज्य सरकारचा संवाद हा निर्णयात असुद्या असेही ते यावेळी म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही स्पष्ट केले की जर विजेचा वापर होत नसेल, घर बंद असेल तर अशा वीज ग्राहकांसाठी सरासरी वीजबिल देण्याची पद्धत थांबवायला हवी, असे त्यांनी यावेळी सांगितले.