काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून ते एका बाजूला कलंडले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन न केल्यामुळे हे होर्डींग्ज बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे. मात्र, ठाण्यातील चार खासदारांपैकी एका खासदाराने या होर्डींग्जच्या उभारणीसाठी पाच लाखांचा हप्ता घेतला आहे. ठाणेकरांच्या जीवाशी खेळणारा हा ’अविचारी’ खासदार कोण आहे?, असा सवाल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आहे. दरम्यान, वागळे इस्टेट येथील डंपिंग ग्राउंडमुळे या भागात राहणार्या सुमारे ३० टक्के नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चार दिवसात हे डंपिंग ग्राउंड बंद न केल्यास ते आपण बंद पाडू, असा इशाराही आमदार आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
‘काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डींग पडले आहे. या होर्डींगची उभारणीच बेकायदेशीपणे करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपठिाने होर्डींग उभारण्यासाठी काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार, त्यांची उंची, रंगसंगती, डोळ्यांवर येणारा तणाव आदी निकष न्यायालयाने घालून दिले आहेत. मात्र, ठाण्यातील एकाही ठिकाणी होर्डींग्जचे हे नियम पाळण्यात येत नाहीत. बुधवारी दुर्घटनाग्रस्त झालेला हा होर्डींग उभारण्यासाठी एका खासदारने पाच लाख रुपयांचा हप्ता घेतला असल्याचे समजत आहे. त्यांनी हा हप्ता भागीदार म्हणून घेतला की अन्य कोणत्या प्रकारे घेतला हे माहित नाही. ठाण्यात कुमार केतकर, श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुद्धे आणि राजन विचारे हे चार खासदार राहतात. केतकर यांच्याशी आपले बोलणे झाले असून ते पत्रकार परिषद घेऊन आपला या प्रकाराशी संबध नसल्याचे जाहीर करणार’, असल्याची माहिती आव्हाड यांनी यावेळी दिली. दरम्यान, पालकमंत्री शिंदे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाचा काही संबध नाही, हे जाहीर करावे. सहस्त्रबुद्धे यांनी विवेकबुद्धीने आपली भूमिका जाहीर करावी. तसेच, राजन विचारे यांनीही चुकीचा विचार करु नये. त्यांनीही पूर्ण विचारांती आपली भूमिका सांगावी, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
दरम्यान, वागळे इस्टेट येथे पर्यावरणाचे कोणतेही निकष न पाळता डंपिंग ग्राउंड सुरु केले आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसात जर हे डम्पींग ग्राउंड ठाणे महापालिकेने बंद केले नाही तर आपण ते बंद करु, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
घरखरेदीत जीएसटीसह एलबीटीचीही वसुली
जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर एलबीटी रद्द करण्यात आलेली आहे. मात्र, ठाणे शहरात घरखरेदी करताना जीएसटी आणि एलबीटी असे दोन्ही कर भरावे लागत आहेत. त्यामुळे ज्यांची एलबीटी घेण्यात आलेली आहे. त्यांना त्यांचे पैसे परत करावेत. तसेच, एलबीटी पूर्णत: बंद करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा ठाणे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे हे देखील यावेळी उपस्थित होते.
वाचा – जितेंद्र आव्हाड आता राष्ट्रवादीचे ‘राष्ट्रीय सरचिटणीस’
वाचा – प्रकाश आंबेडकरांचा इतिहास कच्चा; जितेंद्र आव्हाडांचा टोला