महाराष्ट्रात घडलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबईच्या कुलाबा पोलिस ठाण्यात आज मंगळवारी ७०० पानांची चार्जशीट दाखल केली. या चार्जशीटमध्ये जवळपास २० शासकीय अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यासोबतच शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचाही जबाब या प्रकरणात नोंदवण्यात आला आहे. महाविकास आघाडीची स्थापना होताना घडलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या नेतृत्वातील हे फोन टॅपिंग प्रकरण समोर आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. अनेक टोपण नावांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे या प्रकरणाच्या निमित्ताने उघडकीस आले होते. महाराष्ट्र पोलिसांच्या पुणे पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी रश्मि शुक्ला यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती.
Maharashtra | Mumbai’s Colaba Police today filed a charge sheet of around 700 pages against IPS officer Rashmi Shukla in the phone tapping case. Around 20 people’s statements incl statements of Shiv Sena leader Sanjay Raut and NCP leader Eknath Khadse included in the charge sheet
— ANI (@ANI) April 26, 2022
इंडियन टेलिग्राफ अॅक्टनुसार रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे फोन टॅपिंगचे प्रकरण २०१६-१७ या कालावधीतील आहे. नार्कोटिक्स स्मगलिंक प्रकरणात अमजद खान कनेक्शनमध्ये फोन टॅप झाल्याचा दावा नाना पटोलेंनी केला होता. त्यासोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या स्वीय सहाय्यकाचा, भाजपचे खासदार संजय काकडे आणि इतर लोक प्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मी खासदार असतानाचे हे प्रकरण होते. पण या काळात फोन टॅप करण्याचा प्रश्नच नव्हता. पण आमचे राजकीय करिअर खराब करण्यासाठीच हे प्रकार केले जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला होता.
याआधीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्रिसदस्यीय समितीने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेत समितीची नेमणूक करण्यात आली होती. इतर सदस्यांमध्ये स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, स्पेशल ब्रॅंचचे अतिरिक्त आयुक्त यांच्या उपस्थितीत चौकशी चालली. या समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालानुसारच या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. रश्मी शुक्ला मार्च २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत राज्याच्या पोलीस आयुक्त होत्या. त्यांच्या या काळातच फोन टॅपिंगचे प्रकरण उघडकीस आले.
रश्मी शुक्ला यांनी कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय फोन टॅप केल्याचे समोर आले. या प्रकरणात एसआयडीकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच मुंबई पोलिसांमध्ये मार्च २०२१ मध्ये एफआय़आर दाखल करण्यात आली. ऑफिशिअल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत बीकेसी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग करतानाच गोपनीय कागदपत्रे लीक केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात शुक्ला यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली होती.