राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. याची दखल घेत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने १० हजार कोटी रुपयांची मदत करणार असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याचे वेगळे पैसे देण्याचे आश्वासनसुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदतीची मागणी करणार असल्याचे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
परतीच्या पावसामुळे राज्यात ओल्या दुष्काळाचे संकट ओढावले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार असून त्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यात येईल. जवळपास ५० लाख शेतकऱ्यांनी विमा काढला असून शेतकऱ्यांना विम्याचे वेगळे पैसे देण्यात येतील.