मुंबई : मुंबई महापालिका जल अभियंता खात्यामार्फत ३० जानेवारी रोजी भांडुप संकुल संबंधित जलवाहिनी बदलणे, गळती दुरुस्तीची मोठी कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईतील १२ विभागांत ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजे २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, दोन विभागांत २५ टक्के पाणीकपात लागू होणार असून ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
प्रमुख जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी पाणी पुरवठा कपातीची माहिती दिली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार, मुंबई महापालिका पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेणार आहे. तसेच भांडूप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार असून काही विभागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
या विभागात पाणीपुरवठा राहणार बंद
पश्चिम उपनगरातील के/पूर्व, के/पश्चिम, पी/दक्षिण, पी/उत्तर, आर/दक्षिण, आर/मध्य, आर/उत्तर, एच/पूर्व आणि एच/पश्चिम अशा ९ विभागांत आणि पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.
याव्यतिरिक्त ‘जी/उत्तर’ आणि ‘जी/दक्षिण’ या २ विभागातील माहीम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी व माटुंगा (पश्चिम) या परिसरातील पाणीपुरवठ्यात ३० व ३१ जानेवारी रोजी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.