आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची महायुती जाहीर करण्यात आली आहे. या जागावाटपाच्या वेळी शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांना मिळालेल्या जागांवर सर्वांनी सहमती दर्शवली. यावेळी मित्रपक्षांना १४ जागा देण्यात आल्या. पैकी १२ जागांवर कमळाच्या चिन्हावर मित्रपक्ष जागा लढवणार असल्याने भाजपाने मित्रपक्षांना जागा दाखवल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात सुतोवाच केले आहेत.
आरेविषयी योग्य वेळ आल्यावर बोलणार
आरे येथील वृक्षतोडीला काल रात्रीपासून सुरुवात झाली आहे. पर्यावरणप्रेमी, स्थानिकांकडून या वृक्षतोडीला विरोध होत आहे. त्यामुळे या ठिकाणी जमावबंदी करण्यात आली आहे. काल रात्रीपासून या ठिकाणी विरोध करणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. असे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र आरे विषयी योग्य वेळ आल्यावर बोलू, असे सांगितले. वांद्रे येथील रंगशारदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना उपस्थित पत्रकारांनी आरे विषयी विचारले. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा केली.
महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांची साथ मोलाची
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्व समाज घटकांची साथ मोलाची आहे. यासाठी सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून समाजातील विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार,” असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.