वाडा : तालुक्यातील अभिजात गणेशोत्सव मंडळ ऐंनशेत या वर्षी ७० वे वर्षे साजरे करत आहे.एक गाव एक गणपती हि संकल्पना जोपासल्याने या मंडळाने राज्यभर नावलौकिक मिळवला आहे.सन १९५३ साली या मंडळाची स्थापना झाली आहे. गेली कित्येक वर्षे या मंडळाचा गणपती पाच दिवसाचा असतो.ऐनशेत गावात एकोप्याचे वातावरण आहे.बुजूर्ग मंडळी निर्णय घेतात आणि नवतरूण तो आमलात आणतात.गणपतीचा सण आला की गावातून वर्गणी जमा केली जाते.त्यात कुणालाही सक्ती केली जात नाही.ज्याने त्याने आपल्या यथाशक्तीप्रमाणे वर्गणी द्यायची असते.आरास व सजावटीवर जास्त खर्च केला जात नाही.गणेश चतुर्थीपासून पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी विविध स्पर्धा व खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात गावातील लहानांपासून बुजूर्ग मंडळी, मुले,मुली, महिला यांचा सहभाग होऊन विविध नाटके व एकांकिकाही सादर केल्या जातात. या बरोबरच भजन, हरिपाठही दररोज होतो.गावातील विद्यार्थी किंवा नोकरदारांपैकी विशेष प्राविण्य मिळविणार्यांचा गुणगौरव केला जातो.गावाच्या विकासासाठी सतत धडपड करणार्या, समाज उपयोगी कार्य करणार्या एका ज्येष्ठ नागरिकाची आदर्श व्यक्तीमत्व म्हणून निवड करून त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. याच बरोबर रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर तसेच समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला.त्यांच्या उद्देशाला तडा जाऊ न देता या मंडळाच्या माध्यमातून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो.
प्रतिक्रिया
मंडळाचे हे ७०वे वर्षे असून स्वखुशीने गावातून वर्गणी यावर्षी जमा झाली आहे.शिल्लक रक्कमेतून २०टक्के रक्कम गावामध्ये लोको उपयोगी कामासाठी वापरली जाते.कोरोनामुळे मागील दोन वर्षे दीड दिवस साजरा केलेला गणेशोत्सव यंदा गौरी विसर्जनापर्यंत असणार आहे.विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा या बरोबरच मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.
शशांक ठाकरे
अध्यक्ष
अभिजात गणेशोत्सव मंडळ
ऐनशेत