श्रमजीवी संघटनेच्या संघर्षमय वाटचालीची चार दशकं पूर्णत्वास येत असतानाच ज्या प्रश्नावर संघटना उभी राहिली. त्या वेठबिगारी मुक्तीच्या लढ्याच्या आठवणींना आता उजाळा मिळणार आहे. १ कामगार दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेने मुख्यालय उसगाव येथे ‘मुक्त वेठबिगार बांधवांचा मेळावा’ आयोजित केला होता. कित्येक पिढ्यांची कित्येक वर्षांची गुलामगीरी पाठीवर लादून जनावरांसारखे जगणाऱ्या आदिवासी मजुरांना विवेक पंडित आणि विद्युलता पंडित या दाम्पत्याने माणसाचे जगणे मिळवून दिले. हे आदिवासी बांधव या क्रूर पाशातून मुक्त झालेच. मात्र त्यांच्या पुढच्या पिढ्या, त्यांचे वारस आज समाजात सन्मानाने आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. या यशस्वी लढाईला सर करणारे विवेक आणि विद्युलता पंडित तसेच त्यांच्या त्या काळात लढलेल्या सैनिकांचे त्याग, बलिदानाचे स्मरण करून त्या प्रखर लढा देणाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
१९७६ साली स्व. इंदिरा गांधी यांनी एक कठोर कायदा केला. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा अंमल व्हावा. या धर्तीवर असे क्रांतीकारी कायदे बनवण्यात आले. त्यातीलच अत्यंत क्रांतिकारी कायदा म्हणजे बंधबिगार पद्धत (उच्चाटन) अधिनियम १९७६. हा कायदा पारित झालेला, मात्र अंमलबजावणीचा पत्ता नव्हता. श्रमजीवी संघटनेच्या स्थापनेपर्यंत माणसाला जनावरांची वागणूक देणारी ही वेठबिगारी प्रथा अविरत सुरु होती. संघटनेने आंदोलन आणि मुक्तीचा लढा उभारला आणि हजारो मजुरांना मुक्त करत ही प्रथा त्याकाळात नष्ट केली. या उल्लेखनीय कामाबाबत विवेक आणि विद्युलता पंडित या दाम्पत्याला आंतराष्ट्रीय गुलामगिरी विरोधी पुरस्कार मिळाला आहे.
१ मे रोजी झालेल्या या मेळाव्यात संघटनेच्या स्थापनेच्यावेळी मुक्त झालेले अनेक वेठबिगार जे आजही हयात आहेत त्यांची उपस्थिती लक्षवेधी होती. या मुक्त वेठबिगार बांधवांचे, त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात शासनाची उदासीन असल्याचे यावेळी समोर आले. विवेक पंडित यांनी देखील त्या काळाच्या आठवणींना उजाळा देत हे वेठबिगारच त्या काळचे संघटनेचे नेते होते. त्यांचा त्याग आणि संघर्ष नसता तर आजच्या या सुवर्ण क्षणांचे आपण साक्षीदार होऊ शकलो नसतो, असेही ते म्हणाले. यावेळी लक्ष्मण लहांगे, दुंदु लाथड, बारकु गणेशकर, दामा देसक, मैना किरकिरा, यशवंत सायरे, रेवती रण, केशव नानकर, विमल परेड, गणेश उंबरसाडा, स्नेहा पंडीत, राम वारणा आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.