मुंबई : कर्नाटकमध्ये (Karnataka Election 2023) काँग्रेसने (Congress) स्पष्ट बहुमत मिळाविले आहे. काँग्रेसने आतापर्यंत 125 जागा जिंकल्या असून 11 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपाला 64 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली आहे. उपर वाले की लाठी में आवाज नहीं होती, असे त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मतदारांचे, @INCIndia च्या सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
या निकालाचा अन्वयार्थ स्पष्ट आहे. जनतेला विकास हवा, देव-धर्माच्या नावावर राजकारण नको.
बजरंग बली की जय.
ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती!#KarnatakaVijay— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 13, 2023
जनतेला विकास हवा आहे. देव-धर्माच्या नावावर राजकारण नको. देव-धर्म ही वैयक्तिक आस्थेची बाब आहे. त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कराल तर उपर वाले की लाठी में आवाज नहीं होती, असा टोला काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी भाजपाला (BJP) लगावला.
हेही वाचा – Congress Win : राहुल गांधी म्हणाले – कर्नाटक में नफरत का बाजार बंद, मोहब्बत की दुकानें खुलीं
काँग्रेसला (Congress) समाजाच्या सर्व थरातून पाठिंबा मिळाला. हा विकासाचा, सर्वसमावेशकतेचा आणि एकतेचा विजय आहे. रोजगार, महागाई, सुरक्षा, शांतता, विकास हेच जनतेचे प्रमुख मुद्दे आहेत. काँग्रेसने लोककल्याणकारी योजनांचा जाहीरनामा मांडला. त्यातील आश्वासने एका वर्षात पूर्ण करण्याचा शब्द दिला आणि लोक काँग्रेसच्या पाठीशी उभे झाले, असे अशोक चव्हाण म्हणाले.
भाजपा डबल इंजिनचा गवगवा करते. मात्र कर्नाटकमध्ये त्यांना विकास करता आला नाही. शेवटी देव-धर्माच्या नावावर मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दिलेला बंधुभावाचा संदेश लोकांना भावला. काँग्रेसच्या विचारधारेला समर्थन मिळाले. कर्नाटकातील विजयाचा पाया भारत जोडो यात्रेतच रचला गेला, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा – भाजपाच्या The Karnataka Story चा The End; दक्षिणेचे दरवाजे झाले बंद