किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने अतिशय निराशाजनक कामगिरी केली. त्याने आधी कर्णधार म्हणून काही चुकीचे निर्णय घेतले, ज्यावर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही टीका केली. तसेच क्षेत्ररक्षणात त्याने बऱ्याच चुका केल्या. त्याने लोकेश राहुलचे दोन झेल सोडले. राहुलने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि पंजाबला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. तसेच फलंदाजीत कोहलीला केवळ १ धाव करता आली. त्यामुळे त्याच्या या कामगिरीवर बरीच टीका झाली. कोहलीनेही या सामन्यात केलेल्या चुका मान्य केल्या.
मी राहुलला दोन जीवदान दिले
मी कर्णधार आहे. त्यामुळे मी पुढे येऊन जबाबदारी घेणे गरजेचे आहे आणि तेच मी करत आहे. मला या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही. मी राहुलला दोन जीवदान दिले आणि त्याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. आम्ही पंजाबला कदाचित १८० धावांपर्यंत रोखू शकलो असतो, पण मी राहुलला दोन संधी दिल्याने पंजाबच्या धावसंख्येत ३५-४० धावांची भर पडली. आम्ही पंजाबला थोड्या कमी धावांत रोखले असते तर फलंदाजी करताना आमच्यावर दबाव आला नसता. त्यामुळे मी केलेल्या चुका कुठे तरी आमच्या संघाला महागात पडल्या, असे सामन्यानंतर कोहली म्हणाला.