नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप विधान परिषदेमधील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी बुधवारी केला.
ठाणे व अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाला. नागपूर हे महिलावरील लैंगिक अत्याचारात देशात एक क्रमांकवर आहे. सायबर गुन्ह्यातही नागपूर आघाडीवर आहे, असा आरोप दानवे यांनी केला.
ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे व उप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शहरात गुन्हेगारी वाढत असेल तर अन्य ठिकाणी काय अवस्था असेल याचा विचार करायला हवा. लोकप्रतिनीधी धमक्या देण्याचे काम करत आहेत. नवी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याने एका लोकप्रतिनीला धमकी दिली. अमूक पक्षात जा नाही तर तुला गोळ्या घातल्या जातील, अशी धमकी पोलीस अधिकाऱ्याने दिली. लोकप्रतिनीधी महिलांविषयी अपशब्द वापरत आहेत. याला कुठेतरी आळा बसायला हवा, अशी मागणी दानवे यांनी केली.
एक आमदार मतदारांना धमकावतो. मतदान करा नाही तर विकास करणार नाही, असे आमदार धमकावतो. हे लोकशाहीला शोभणारे नाही. गणोशोत्सावात एक लोकप्रतिनिधी गोळीबार करतो. तेथील बुलेट जप्त केल्या जातात. त्याची तपासणी केली जाते. मात्र अद्याप त्यावर कारवाई होत नाही. ही कारवाई कधी होणार, असा सवालही दानवे यांनी केला.
महाराष्ट्रात होणाऱ्या मुले विक्रीवरही दानवे यांनी सरकारचे लक्ष्य वेधले. चार चार हजारात मुलांची विक्री होते. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. मुलांना गुरे वळण्याची कामे दिली जातात. अशी कामे करताना एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे लहान मुलांना गुरांची कामे देणे हे बालमजुरीच्या व्याख्येच येत नाही का?, बालमजुरी ही केवळ हाॅटेल व धाब्यावरच होते का?, असा सवाल दानवे यांनी केला. गुरांच्या कामांना जुंपलेल्या मुलांकडेही सरकारने लक्ष्य द्यायला हवे, अशी मागणीही दानवे यांनी केली.
यावेळी दानवे यांनी लंपी आजारामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटाचा मुद्दा उपस्थित केला. या आजारामुळे शेतकऱ्यांना गुरे विकावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करायला हवी, अशी मागणी दानवे यांनी केली.